श्रावण..
श्रावण...
आषाढ संपता वेध श्रावणाचे
पवित्र सण,पवित्र महिना गुण श्रावणाचे
उपवासाचा महिना,सणांची रेलचेल
निसर्गाची लयलूट, समृद्ध भाज्या, समृद्ध हिरवळ,....
तरी ही श्रावण मास पहिला जसा राहिला नाही.
मंगळागौर पूजा, सत्यनारायण पूजा
श्रावणी पूजा अन् मुंजा, कुमारिका पूजन
सर्व होत आहे घरोघरी पण ....
पूर्वी सारखा नात्यांचा गोंगाट, मुलांचा किलबिलाट
कुठे तरी राहून जातं आहे..याची खंत मनात..
म्हणून श्रावण मास पहिला जसा राहिला नाही.
मुलींची किलबिल, सडा रांगोळ्यांची आंगण
नवीन बांगड्यांची किणकिण,मेंदीच्या हातांची नक्षी
झोक्यांची, फुगड्यांची चढाओढ ,मुलींची खुसफुस
रंगीबेरंगी कपडे घातलेले विद्यार्थी विद्यार्थिनी
गोड सुवासिक वासांनी पसरलेला दरवळ,
पुरणाचा राबता,शेजारी पाजारी देवघेव,सारं शांतशांत
वाटते श्रावण मास पहिला जसा राहिला नाही
गौरी स्थापना,जिवतीची पूजा, नागपंचमी
सणवार, पूजापाठ , सवाष्ण जेवण आता वेळेनुसार...
खरं आहे कारण करियर ही आज महत्वाचे आहे.
मागच्या पिढीचा वारसा पुढे जातोय की ढकलतो आहे
पूर्वीचे धर्म संस्कार ,कर्मकांड कमी होणारच आहेत
माणसं बदलत आहेत,चालीरीती बदलत आहेत..
म्हणूनच श्रावण मास पहिला जसा राहिला नाही.
एका पाठोपाठ उठणाऱ्या पंक्तीचा थाट नाही
वदनी कवल घेता नाम श्री हरीचे नाही...
त्यात आग्रहाने वाढणाऱ्या वहिन्या नाहीत
पक्वान्न खाताना आता पैजा लागत नाहीत
सोवळ्या ओवळ्यातील स्वयंपाक गेला खुंटीवर
म्हणून म्हणते श्रावण मास पहिला जसा राहिला नाही.
मंगळागौरीचे खेळ खेळायला मुली नाहीत
म्हणून पैसे देऊन ग्रुप बोलावतो
घरात स्वयंपाक करायला घरची कुणी मदतीला नाही
म्हणून सणासुदीला स्वयंपाक ऑर्डर होतो.
एवढेच काय शुद्ध पाणी हवे म्हणून ते ही विकत घेतो
कारण श्रावण मास पहिला जसा राहिला नाही.
श्रावण आला श्रावण गेला
मनाचा कोपरा हळवा झाला
सखीचे वाजे अलवार पाऊल
फिरून येई आठवांची चाहूल
.....................................................................
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
30/7/25
