काय लिहावे किती लिहावे
काय लिहावे, किती लिहावे,
तुला शब्दांच्या पलीकडे लिहावे.
श्रावणाची सरी लिहावी,
की तुला नभातली वीज लिहावे?
डोंगरातून उफाळून येणारा झरा लिहावा,
की सरितेची निर्मळ धार लिहावी?
फुलांच्या पाकळ्यांवरची दवबिंदूची चाहूल,
की चांदण्यात न्हालेली रात्र लिहावे?
तुझ्या डोळ्यांत दडलेले आभाळ लिहावे,
की ओठांवरचे अबोल गाणे लिहावे?
तुझ्या स्पर्शाने उमललेले मन लिहावे,
की धडधडणाऱ्या हृदयाचे भान लिहावे?
काय लिहावे, किती लिहावे,
तुला शब्दांच्या पलीकडे लिहावे.
शब्द सारे अपुरे पडतात,
म्हणून तुला फक्त मनात जपावे.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
