एक धागा सुखाचा
आजोबांचं निधन झालं अन् बाराव्या दिवशी बारावे कार्य पार पडल्यानंतर बैठक पार पडली.खूप लांबून लांबून पाहुणे आले होते.दादरल्या राहणाऱ मोठया मामांनी थेट अण्णांना प्रश्न विचारला,मामा आजवर मोठया मामांनी सर्व कुटुंब एकत्र ठेवलं होतं.आता ते गेले मग पुढे काय करणार आहात."
कार्याला आलेली दोनशे तीनशे लोक आण्णा काय उत्तर देणार याकडे डोळे लावून बघत होती.
आण्णा माझ्या आजोबांचे धाकटे बंधू..सर्वजण त्यांना आण्णा म्हणत.आण्णा स्वभावाने सरळ,स्पष्ट आणि प्रामाणिक.दिलेल्या शब्दाला कधीही मागे घेत नसत.त्यामुळे विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून पंचक्रोशीत त्यांची ओळख होती.कुटुंबाची जबाबदारी तशी त्यांच्याकडे नव्हती.पण आजोबांच्या अचानक जाण्याने त्यांच्यावर जबाबदारी आली होती. आज तर त्यांची कसोटी होती.कुटुंब आहे तसे एकत्र ठेवतात की वेगळे होण्याचा निर्णय घेतात याबाबत दबक्या आवाजात लोक चर्चा करत होते.काहीजण अण्णा वेगळे होतील तर काहीजण एकत्र कुटुंबातच राहतील असा अंदाज लावत होते.प्रत्यक्ष निर्णय काय ते मामांच्या प्रश्नांने कळणार होते.
अण्णांनी तोंड उघडले,"माझा मोठा बभाव गेला म्हनुन माज दुक हाय आमचा संसार उघडा पडला हाय हय दिसतंय पन आता या घरात मीच मोठा मलाच घरदार संभालाय पायजे."
"अण्णा ते आहेच पन तुम्ही एकत्र राहणार ना पहिल्या सारखे."नाना मास्तर मध्येचबोलले.
"हो नाना,मी जीवन हाय तोवर हा संसार फुटू देनार नाय."
"बघ अण्णा,अजून येल गेली नाय हाय,अजून इचार कर,आनि काय यव्यस्थित सांग."शेजारचे आप्पा बोलले.
"अरे,तुमी ओलखता मला.एकदा शबुद दिला की दिला.परान गेला तरी बेहतर."अण्णा ठामपणे सांगू लागले.
"मंडळी,पूर्वीसारखं कुटुंब एकत्र होतं तसं यापुढेदेखील कुटुंब राहणार आहे. अण्णांनी मान्य केलं आहे आणि तशीच त्यांची इच्छा आहे."नाना मास्तरांची ही वाक्य सर्वजण ऐकत होते.
खरं तर अण्णांच्या कृतीचा सर्वाना अभिमान वाटत होता.
माझं वय जेमतेम दहा वर्षे असेल पण त्या वयात देखील अण्णांचा गुण भावला होता.कुटुंब प्रमुख म्हणून अण्णाकडे जबाबदारी आली होती.अण्णांनी कुटुंब एका धाग्यात कसं राहील यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न केले होते.
.चार भांडी एकत्र आली की,आवाज होतोच.काही वेळा आमच्या घरी भांडी वाजली.पण त्या भांड्यांचा आवाज घरापूरता कसा मर्यादित राहील याची पुरेपूर काळजी अण्णा घेत असत.मतभेद झाले तर हळुवार शब्दात पांघरूण घालत. केव्हा केव्हा अण्णां खूप त्रास करून घेत असत.खूप चिडचिड होत असे.पण कालांतराने त्यांची चिडचिड नित्याची बाब ठरली.फारसं मग कोणी मनाला लावून घेत नसे.
अण्णा अभिमानाने सांगत असत,"मी 42 माणसांचा कारभारी.माझा कारभार बघा आणि जीवनात तसं वागा."गावात एकत्र कुटुंबाची खूप चर्चा व्हायची.लोक विभक्त होणाऱ्या कुटुंबांना आमचय एकत्र कुटुंबाचे उदाहरण देत असत.
अण्णा म्हणजे सुखाचा एक धागा होते. सुमारे 35 वर्ष त्यानी कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी पेलली.
त्यांच्या काळात आम्ही खूप सुख अनुभवलं. परिस्थिती नसताना त्यांनी शिक्षण दिले. म्हणूनच आज चांगले दिवस आहेत.
अण्णा आज हयात नाहीत. पण कुटुंबप्रमुख म्हणून त्यानी जे कार्य केले त्याला तोड नाही.आण्णा,आज तुमच्या मेहनतीने मिळालेलं वैभव बघायला हवे होतात.
तुम्ही धागा होतात.......सुखाचा.... सुखाचा धागा!
श्री.दिलीप शंकर चव्हाण
रत्नागिरी