निष्ठावंत राम
निष्ठावंत राम (कासव)
विदर्भातील एक सुंदर शहर वाशिम. तिथे माझे मावस दीर विजय कोकाटे आणि त्यांची अर्धांगिनी छाया दोघच राहतात. त्यांच्या शेजारी एका मोठ्या बंगल्याचे काम चालू असल्याने बाळू रेतीचे ट्रक येत होते. बऱ्याच मजुरांची वर्दळ होती. ती संध्याकाळची वेळ होती. विजय चहाचा आनंद घेत व्हरांड्यात खुर्चीत बसले होते. त्यांच्या पायाशी काहीतरी हालचाल झाली, खाली वाकून पाहिले तर एका कासवाचे लहानशी पिल्लू होते. ते त्या शेजारी आलेल्या रेतीतून आले होते.
विजयने हाक मारली," छाया बघ! आपल्याकडे कोण पाहुणा आला आहे."
छाया लगबगीने बाहेर आली आणि विचारले, "कुठे आहे?"
" हे बघ माझ्या पायाशी"
"अरे किती छान कासवाचे पिल्लू!"
बराच वेळ दोघेही पहात राहिले. ते घरात जाऊ लागले, छाया म्हणाली "हा स्वतःहून आला आहे, याला आपण आपला फॅमिली मेंबर समजू."
त्याला एका पाण्याच्या टबमध्ये ठेवले. काकडी टोमॅटो खाण्यासाठी दिले. त्यांची करमणूक होऊ लागली त्याचे नाव राम ठेवले. तो मोठा झाला आणि पाच-सहा वर्षे निघून गेले.
एकदा विजय पंढरपूरला गेले होते, दुर्दैवाने त्यांना तिथे पॅरेलेस चा अटॅक आला.
त्यामुळे आता छायाला त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावे लागत होते.
तिच्यावर दोन जबाबदाऱ्या आल्या त्यात तिची प्रकृती ही बरी रहात नसे.
एक-दोन वर्षांनी विजयची तब्येत थोडी ठीक
झाली पण त्यांना सहाय्याची जरूर लागत होती. एकदा छाया म्हणाली, "अहो मला तुमचे आणि रामचे करावे लागते. थकून जाते. माझ्याच्याने होत नाही याला आता एखाद्या तलावात किंवा विहिरीत सोडून या."
आणि काय आश्चर्य जणू त्याने ऐकले! त्या दिवसापासून त्याने खाणेपिणे सोडून दिले. सुस्त राहू लागला असे एक दोन दिवस निघून गेले.
त्याला डॉक्टरांनी जवळ पण नेले डॉक्टरांनी तपासून आठ दिवसाची औषध दिली. पण काही उपयोग झाला नाही. घरात उदास वाटू लागले. त्या दोघांनाही वाईट वाटू लागले. काय झाले असेल रामला? नंतर धनतेरसच्या रात्री विजय जिथे झोपले होते तिथे कानाशी येऊन बसला व प्राण सोडले. रामला त्यांना सोडून कुठे जायचे नव्हते. हे त्यांना नंतर समजले. त्या वर्षी त्यांनी दिवाळी साजरी केली नाही! असा होता निष्ठावंत राम.