माझी मर्जी , नो पार्लेजी
... माझी मर्जी नो पार्ले G ...
कोरोना काळात घरी राहून खूप नवीन अनुभव आले . त्यात मला जाणवलं की आपण भूतकाळा विषयी खूप विचार करत असतो . भूतकाळातल्या आठवणी आपल्याला खूप आनंद देतात . आता पन्नाशी ओलांडली तर तीशी किती छान ,तिशीत असतो तेव्हा काॅलेज लाइफ काय मस्त होतं असं वाटतं ., कॉलेजला असताना शाळेतलं जीवन आवडतं ,छोट्या मुलांना किंवा बाळांना बघितलं की वाटेल हे पोरं किती सुखी ह्यांना काहीच काळजी नाही, असो खरे आहे ना ??
मग काय या कोरोना काळात जुन्या गोष्टी खूप आठवतात . अशीच काही आंबट - गोड आठवण आली ...
माझी बी.एससी .ची परीक्षा झाली आणि रिझल्ट पण नव्हता आला आणि माझं लग्न एका डॉक्टर मुलाशी ठरलं . डॉक्टर असल्याने नाही पण म्हणता आले नाही . मग काय बाकीचेे शिक्षण लग्ना नंतर कर असं सांगून लग्न झालं .
लग्न ठरल्यावर आम्ही सिनेमा पाहायला गेलो.इंटरव्हल मधे फक्त एक कोल्ड- ड्रिंक... . तेही कां कारण पाणी स्वच्छ नाही म्हणून..... पहिले काळी
अश्या पाण्याच्या बाटल्या मिळत नसे .. पहिला धक्का तिथेच बसला . आपलं काही खरं नाही बुवा आता .
आम्ही एका छोट्या गावात होतो तिथे भाज्या मिळणे सुद्धा कठिण . मग महिन्यात एकदा तरी इंदौरला जायचं . पहिल्यांदा आम्ही दोघे इंदौरला आलो
बाहेर फिरायला गेलो .पण काय सर्व खाण्याची दुकान निघून चालली... समोसे , कचोरी चाटचा वास नाकात शिरत होता .आता तरी कुठे थांबून आपल्याला काही खायला मिळेल पण हे काय सर्व दुकानं संपत आली काहीच मिळेना . तरी मी बोलले काही खायचं का आपण , तर माझा नवरा चक्क नाही म्हणाला ....
"बाहेरचे खाऊन तब्येत बिघडेल..."
"अरे देवा आता काय कचोरी , समोसे सुटतिल की काय??"
मी स्वतःशी पुटपुटले ..
पहिला प्रसंग म्हणून चुपचाप राहिले .
आता आम्ही ग्वालियरला जायला निघालो होतो. विचार केला शिवपुरीला काही मस्त मुंगोडे खायला किंवा लस्सी प्यायला मिळेल . शिवपुरी आलं मी विचार केला. उगाच केला! उगाच रिस्क नको म्हणून बोलले "बघा न खाली काही मिळत असेल तर.."
"हो बघतो" म्हणून खाली उतरले .मनात विचार केला चला काही तरी च़टपटीत खायला मिळेल . वर चढतांंना हातात पिशवी दिसली अरे व्वा! चला आणले काही तरी.
" काय मिळालं?" मी विचारले..
" काही सुध्दा बरं नाही..."
"अरे मग तुम्ही काय आणलं..."
"पारले जी चे बिस्किट्स.."
राग तर असा आला की काय सांगू .पण शांत राहिले . चुपचाप बिस्किटे खाल्ली . मनात ठरवलं
हे असे चालता कामा नये .काही तरी करावे लागेल .
डॉक्टरला वाढदिवसाला गिफ्ट म्हणून पहिले तर पारले जी चे पॅकेट्स दिले . तुमची आवडती वस्तु म्हणून .मनाला थोडी शांती मिळाली .
आता आम्ही पुन्हा इंदौरला चाललो होतो . पुन्हा बाहेर फिरायला निघालो . खाण्याची दुकानं आली आम्ही रिक्षेेेत होतो ..मी म्हणाले, "भैया बस इधर ही रोकना ."
" इथे कशाला थांबायचे .... ?"
"मला काम आहे" असं म्हणून मी सरळ चाट वाल्या
कडे आले . "भैया जरा दो पॅटिस देना ." तो पॅटिस देतो तोवर बेटर हाफ ला विचारले .. "तुम्ही खाणार का? नाही तर मी दोन्ही खाते . .."
"आता तू खाते तर मग मी पण खातो" .असं म्हणून त्यांनी पण खाल्लं . लगेच पुढ़च वाक्य ही बोलून टाकलं "मी तर दर वेळी खाणार ". मग पाणी पुरी वर ही हाथ साफ़ केला ..
मनात हसू येत होतं आणि आनंद कि एक लढा जिंकला. आता पुढचा रस्ता सोपा ..
एकदा आम्ही दोघे आणि दीर जाऊ सिनेमा ला गेलो . इन्टरवल मधे माझी जा़ऊ समोसे घेऊन आली .
पुन्हा सिनेमा सुरू झाला तर अंधारात आम्ही तिघांनी मस्त समोसे खाल्ले आणि माझ्या बेटर हाफला दिलेच नाही . घरी आल्यावर सांगितलं आणि खूप हसलो , त्यांना ही हसु आलं .
माझ्या सासूबाई ना सांगितलं तर त्या ही हसल्या .म्हणाल्या "बरं आहे मी सक्खी आई आहे , सावत्र असते तर माला छळून काढलं असतं .फ्रिज़ नव्हतं तेव्हा या दोघांना काही खायला दिलं कि नेहमी शंका करायचे. आई नि काही शिळ तर दिलं नाही ना" ..असो .
आता तर माझ्या नवऱ्याला बाहेर खायला आवडू लागलं .फक्त एकच अट असते कि चांगल्या
ठिकाणी खायचं तेवढं मी ऐकलं आहे ..
मग काय छान सगळं चाललेलं आणि हा कोरोना .. अरे कोरोना अब तो अपना सफर खत्म करो ना.......