अतिथी सुखी भव:
"कोणी तरी आपल्याला जेवायला बोलविले पाहिजे" मी वैतागानी बापूसाहेबांना म्हणालो.
बापूसाहेब माझे मेव्हणे. माझ्या मोठ्या बहिणी चे पती. त्या वेळेस मी उज्जैन ला होतो, माझ्या कॉलेज ला सुट्टी होती म्हणून. माझा खवैयापणा माझ्या बहिणीला माहित होता. तिचे नाव बेबी . वयाने ४० शी पण नाव मात्र बेबी. खूप आवडीच्या वस्तू खायला मिळतील अशी माझी सुप्त इच्छा. पण , एका कामासाठी तिला उज्जैन च्या बाहेर जावे लागले होते. म्हणून अशा खवय्ये पणा वर पाणी फिरले. बापूसाहेब आणि मी, दोन्ही आम्ही सारखेच. जेवण करणे हा आमचा प्रांत नव्हता.आम्ही म्हणूनच दोघे वैतागलो होतो.
" उज्जैन मध्ये कोणी ओळखीचे आहेत काय ?" आम्ही विचार करीत होतो. आणि आम्हाला गलांडे कुटुंब आठवले. ताई आणि गलांडे काका. ताई काम हळू करायची पण जेवण मात्र उत्तम बनवायच्या. त्याच्याकडे ताबडतोब जायचे ठरले.आमचे त्यांचे कडे स्वागत झाले. त्यांनी बेबी बद्दल विचारले . "तिला बाहेर जावे लागले ." हे आम्ही सांगितल्या बरोबर " मग उद्या संध्याकाळी सात वाजता या ना तुम्ही" हे ऐकुन आम्ही त्यांचे आणि मनोमन देवाचे आभार मानले. ऊद्या काय मेजवानी मिळेल असा विचार करीत आम्ही घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी बरोबर सात वाजता आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. गेल्या बरोबर आम्हाला चहा मिळाला. थोड्या वेळानंतर ताई म्हणाल्या " मी पोहे करते " .तेव्हां आम्ही म्हणालो" पोहे खाऊन जेवणाचा विचका होतो" . " हे तर खरेच" असे म्हणून ताई आत मध्ये निघून गेल्या.
मग आमच्या गलांडे साहेबांबरोबर गप्पा गोष्टी सुरू झाल्या. सुमारे एक तास झाला. पण ताई कडून जेवणा बद्दल अजून काही निरोप आला नाही. मग, बापू साहेबांनी मला खूण केली, आत बघून ये. मग मी पटकन उठलो आणि आत मध्ये गेलो. तर काय दिसले ? ताई किचन मध्ये जमिनीवर चक्क झोपल्या होत्या. जेवणाचा काही पत्ता नव्हता. मग बाहेर येऊन मी बापुं साहेबांना खूण केली.आणि " आता आम्ही निघतो" असे म्हणून आम्ही गलांडे साहेब चा निरोप घेतला." परत या बर तुम्ही. " ते म्हणाले.
आम्ही बाहेर आलो .भूक तर खूप लागली होती, पण रात्र खूप झाल्यामुळे सर्व रेस्टॉरंट बंद झालेले होते.
मग घरी जाऊन पिठले भात असे "मस्त "जेवण करून आम्ही झोपलो.