अकस्मात
अकस्मात
मधूचं लग्न होताच तिचं पाहिलं पाऊल सासरला पडले आणि सासरच्या मंडळींनी तिचं अगदी प्रेमळ शब्दांनी आनंदाने स्वागतच केलं. घरात मधूच्या आगमनाने उत्साह संचारलेला. मधूचा स्वभाव प्रेमळ आणि मनमिळाऊ असल्यानं, दोन-चार दिवसातच घराला घरपण आलेलं. तिने आपल्या आदरार्थी वागण्याने सर्वांना आपलेसे करीत सगळ्यांची मने तिने जिंकली. सासूला सून अगदी मुलीप्रमाणे तर सासर्याला सूनेमध्ये मुलीचे रूप भासत राहिले. मधूचे देखने रूप आणि नावाप्रमाणे तिचं निर्मळ वागणं, मधुर बोलनं सर्वांना लळा लावून जायचा. याप्रमाणे आता चार वर्ष लोटून संसार वेलीवर एक बाळही झालेलं होतं.
मधू प्रणयची जोडी जोडप्यांमध्ये उठावदार खुलून दिसायची. सर्वांची मने आकर्षूण घेणारी ती प्रेमळ जोडी होती. दोघेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे. प्रणयला तिच्या शिवाय एक क्षणही करमत नसे. तिच्या मागे तो नेहमी घुटमळत राहायचा. सावित्री-ज्योती प्रमाणे जणू एकमेकांचा विश्वास आपसात निर्माण झालेला आणि त्यांचे एकमेकांसाठी जगणे, प्रेमळ वागणे, बोलणे पाहून सासु-सासर्यांना स्वतःच्या गत क्षणांची स्मरणे होत राहायची. त्यांच्या आनंदाला भरती येत होती. हसत, खेळत, बागळत नवीन संसाराला झालेली ही सुरुवात, सगळं कुशल चाललेलं होतं. आनंदात एक-एक दिवस पुढे-पुढे सरकत गेलेले.
प्रणय आज नेहमीपेक्षा सकाळी उठलेला. प्रात:विधी उरकून, कुठेतरी बाहेर कामानिमित्य जाण्याचा बेत आहे, हे अचूक मधूने ओळखलेलं.
“अहो, चहा घ्या ना!”
“फक्त चहाच .....” मधूच्या लाडिक प्रश्नाला त्याने अगदी लडिवाळ होत दिलेल्या उत्तराने ती स्मित हसत लाजली. तिला प्रणयचा रात्रौ प्रमाणे असलेले रोमांटिक मन लक्षात यायला उशीरही लागला नाही. मधू, काय समजायचे ते समजली.
“इश्श....!” अगदी त्रोटक एकाच शब्दात प्रणय तिच्याकडे बघतच राहिला.
“मधू, तुला काहीतरी सांगायचं आहे गं, बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात यावर अनेक विचार घोळत आहेत पण.....”
“काय सांगणार आहात?” ती प्रणयच्या बोलण्याकडे आतुरतेने बघू लागलेली.
“मधू, मी काय म्हणतो. अगं तुझी पाठची बहीण प्रीती आता वयात आलेली. तिला जोडीदार पाहायला नको का?” मामाजीने मला याबाबत मागे सुचविले. तुला काय वाटते याबाबत.”
“हो ना! बाबांना वाटते आहे तर बघा ना एखादा साजेसा अनुरूप वर, तुम्ही नाही तर कोण मदत करणार त्यांना या कामात.” मधूने आपले मत प्रदर्शित केले.
“होय! मलाही तसेच वाटते आहे. म्हणूनच आज मामाजीकडे जाऊन येतोय. त्यांचा विचार घेऊन मगच लागता येईल कार्याला.”
“वरमोहिमेला, तुमच्यासारखे भाऊजी असल्यावर काय वेळ लागणार आहे काय?” ती हसत हसतच म्हणाली.
“बरे! तुझा होकार आहे तर.... मधू येतो मामाजीची भेट घेऊन. तू निसंकोच राहा.”
प्रणयच्या सहकार्य भूमिकेने मधूला फार बरे वाटले होते. तो तिचा निरोप घेत निघालेला.
प्रणय सकाळच्याच बसने साखरवाडीला पोहोचलेला. मधू सामान्य कुटुंबातील मुलगी असल्याने तिचे माहेरचे घर लहानसे होते. सासऱ्यांचे घर वस्तीच्या अगदी बाहेर होते. गावकऱ्यांना कोणी आल्या गेल्याची चाहूलही लागत नव्हती. सासू-सासरे सकाळी शिदोरी घेऊनच शेतावर गेलेले. उडीद पीक सावंगण्याचा हंगाम सुरू होता. पीक अगदी वेळेवरच काढणे उचित ठरायचे नाहीतर उडीदाच्या शेंगा उन्हामुळे फुटून जमीनदोस्त होतात. म्हणूनच सासू-सासरे उन्हाच्या भीतीनं शेतावर गेलेले. शेत गावापासून बरेच लांब होते. त्यांना यायला सायंकाळच होणार होती.
प्रीती घरची कामे करण्यासाठी एकटीच घरी थांबलेली. प्रीती अंघोळ करून अंतर्वस्त्र परिधान करीत असतांनाच प्रणय घरात पोहोचलेला. प्रीतीचा चंद्रासारखं सुंदर रूप टवटवीत दिसू लागले. प्रणयची नजर तिच्या अर्धवस्त्र अंगप्रत्ययावर स्थिरावलेली. प्रीती अचानक घरी आलेल्या भाऊजींना बघून विचलित झालेली. दोघांचेही नजरेमध्ये कामूकतेचा भाव संचारून उफाळून येऊ लागलेला.
प्रणय खाटेवर बसलेला. प्रीतीने स्वतःचे कपडे सावरत भाऊजी करिता प्यायला पाणी दिले. प्रणयचे पाणी घेतांना तिच्या हाताला झालेला स्पर्श त्याला मोहरवून गेलेला आणि क्षणभर प्रीतीला विजेच्या धक्क्यागत करंट लागावे असेच घडले. तिची मोहक नजर त्याकडे आकर्षित होऊ लागलेली. दोघेही एकमेकांशी बोलतांनाच प्रीतीची ओढणी खाली पडलेली. प्रणय तिच्या रुपाला न्याहाळत मनाने विरगळत जाऊ लागला. अकस्मात मनाची धुंद नशा दोघांच्याही डोळ्यात भरून वाहू लागलेली. प्रणयला आता ते टाळणे, वा प्रीतीने अंतर राखण्याचा प्रयत्न करतानांच दोघेही एकमेकांच्या मनाला मूक सहमती देत एकत्र आलेली. प्रणयला त्या लुसलुशीत तारुण्याचा उपभोग घेण्याचा मोह अधीर करून गेलेला. विस्तवाजवळ तूप नेलं की, ते वितळणारच. दोघांचेही नाते अगदी असेच. मादकतेच्या मंद लहरी हवेत तरंगत होत्या तेवढ्याच मनाने त्या दोघातही संचारत गेलेल्या. त्यांना समीप खेचत प्रणयक्रीडेला हाक देणाऱ्याच. पुरुषार्थाला जाग आलेली. त्या क्षणी त्या मादक मगर मिठीत दोघांनीही एकमेकाला सामावून घेत कधी स्थिरावले हे त्यांना कळलेच नाही. क्षणभरातच प्रणय तिच्या जवळ जात तिला घट्ट बिलगत जवळ ओढले होते. प्रीतीही अकस्मात प्रणयच्या बाहुपाशात नकार देत विलीन झालेली. दोघांचेही मन एकमेकात मिसळलेलं आणि अंग रोमरोम फुलून आलेलं....
प्रणय एका मुलाचा बाप असूनही त्याचा रुबाबदार देह अनपेक्षितपणे प्रीतीच्या रूपावर भाळून गेलेला. प्रीती तारुण्यरसाने रसरसीत तरुणी शारीरिक सुखाच्या आस्वादात जणू क्षणभर सारे काही विसरून रंगून गेली. त्याक्षणांची तिची लालसा उफाळून आलेली आणि यातच कुठलाही विचार न करता एकाएकी घडलेला प्रसंग.
मिठी सैल झाली तेव्हा दोघेही एकमेकांकडे अपराधी भावनेने बघू लागले पण कृती घडून गेलेली पर्याय उरला नव्हता. प्रणय दुपारला सासऱ्यांची वाट न बघता प्रीतीचा निरोप घेत गावाकडे परतलेला. प्रीती त्याच्या अकस्मात कृतीला जणू पुनश्चः येण्याचा मूक संदेश देत त्याकडे जातांना डोळाभर बघत राहिली. तिचे सर्वांग जणू फुलून आलेले. तेवढेच प्रणयात न्हाहून निघालेले. तिच्या मनाला जणू बहर आलेला.
“अहो, काय म्हणाले बाबा!” मधूनी मधुर स्वरातच लाडिक होत विचारलं.
“ठीक आहे, म्हणाले.”
“चहा ठेऊ काय? लांब वरून आल्याने खूप थकवा आला असेल ना!”
“नको. असू दे!”
“मग केव्हा निघायचे आहे वरशोधमोहिमेला....?”
“शेतीचे काम आटोपले की निघू म्हणाले.”
प्रणयच्या आवाजात पूर्वीसारखा नैसर्गिकपणा मात्र जाणवत नव्हता, मधूला त्याचे अडखळत बोलणे, अपराधी भाव चकित करून जात होती.
“तुमची तब्येत वगैरे, ठीक आहे ना!”
“हो! हो...! ब...बरी आहे...... मला काय झाले, छान आहे मी....”
“मग, असे दबक्या आवाजात का बोलत आहात.”
“काही नाही... थोडं अस्वस्थ वाटतं आहे. बाकी काही नाही....”
प्रीतीला शारीरिक सुखाची चटक लागलेली. प्रणय आणि प्रीतीला एकमेकांबद्दलचे शारीरिक आकर्षण वाढत चालले होते. कोणत्याही बहाण्याने प्रणय सासरला जात–येत राहिला. मात्र तेवढाच मनाने प्रीतीच्या मन धुंदीत रमत मधूला टाळूही लागलेला. त्याला प्रीती शिवाय काहीही दिसत नव्हते. प्रीतीला फिरायला नेणे, तिच्या आवडीचे कपडे, चैनीच्या वस्तू खरेदी करून देणं, तिची हौस पूर्ण करणं, यातच प्रणय दिवसेंदिवस गुंतत चाललेला होता. या गुंगीत मधूकडे कानाडोळा करायला सुरुवात झालेली.
प्रणयचे वारंवार सासरी येणे व प्रीतीच्या वागण्यातील अकस्मात बदलामुळे हा प्रकार सासू-सासऱ्यांच्या लक्षातही आला होता पण गावात मुलीची बदनामी होईल या भीतीने त्यांनी चूप राहणेच पसंत केले. मुलीला व जावयाला कशा प्रकारे समजवावे याचाच ते विचार करू लागले होते. ‘आपलेच दात, आपलेच ओठ,’ इकडेजावई, तिकडे मुलगी. दोन मुलींचे भविष्य डोळ्यासमोर येत राहिले. कुणाला काय बोलावं, काय करावं? अशी द्विधा मन:स्तिथी. दोघांनांही काहीही सुचत नव्हतं. मधूला सांगावं तर विपरीत परिणाम होईल ही भीती.
प्रीतीचे वागणं बदललेलं. मधूच्या मागे-मागे रेंगाळणारा प्रणय तिच्या नजरेला नजर भिडवत नव्हता. स्पर्श तर दूरच राहिलेला. जास्त बोलणं नाही, अबोल रहाणेचं पसंत करायचा. मुलाचे गोड कौतुकही विसरलेला.
मधू सारखी विचारमग्न असायची. काय झालं असेल यांना! कुण्या दुष्ट स्त्रीची नजर माझ्या संसारला लागली तर नसेल ना! पण काही केल्या उत्तर मिळत नव्हतं. मधू आता सारखी चिंताग्रस्त राहू लागली. पतीच्या वागण्यामुळे भूक, तहान, झोप उडून गेलेली होती. मधूसारखी देखणी मुलगी दिवसेंदिवस शरीराने खंगत चाललेली. संसारगाडा उलटण्याचे स्वप्न तिला समोर दिसत होते.
रात्री मधूला झोपच आली नाही रात्र कशीतरी उलटली होती.
“चहाचा कप प्रणयला देत म्हणाली.”
“मी आईकडे चार दिवसाकरिता जाऊ काय?”
“कशाला?”
‘मला बरं वाटत नाही आणि आई-बाबांची बऱ्याच दिवसापासून भेटही झाली नाही म्हणून जाऊन यावं म्हणते.... त्यांना समाधान वाटेल जाऊ काय मग?”
“बरे ! तुझी इच्छाच आहे तर जा...” प्रणय जड अंत:करणाने म्हणाला होता. ‘जा’ म्हणण्यात स्पष्टता दिसत नव्हती. हे मधूच्या लक्षात आलेले.
सकाळचे नित्य नियमाचे कामे आटपून ती मुलासह माहेरी निघाली होती. आई-वडील घरीच होते. त्यांचे ते निस्तेज चेहरे, खंगलेले शरीर पाहून मधूला धक्काच बसला होता. तिचे डोके गरगरायला लागलेले. मधूला बघताच दोघांच्याही डोळ्यातून अश्रुंच्या धारा बरसू लागल्या होत्या.
“आई काय झालं? बोलत का नाहीत तुम्ही....?”
“सांगा ना! काहीतरी.... मला कसं कळेल?”
“मधू बस! घराण्याची इज्जत वेशीवर टांगण्याची वेळ आली ग.”
आईच्या बोलण्याने ती हादरली. त्या क्षणीच प्रीतीचा चेहरा मात्र तिला प्रसन्न, टवटवीत, फुललेला दिसून आला. मधूला अजूनही खरं उत्तर मिळालं नव्हतं.
रात्र झालेली... जड अंत:करणाने जेवण करीत मधू आईसह झोपायला गेली. आईने मधूला सर्व हकीकत सांगितली. प्रीतीला दिवसही गेल्याचे मधूला कळले होते. हा सारा प्रकार एकूण तिचं काळीज धडधडायला लावणाराच होता. 'इकडे आड, तिकडे विहीर' इकडे नवरा, तिकडे बहीण. काय करावं? काहीच सुचत नव्हतं. तरीपण मधूने मनाला बांध घातला होता. कशीबशी रात्र घालविली होती.
दिवस उजाडताच ती कुणालाही काहीही न सांगताच निघाली. घरी पोहोचली. प्रणय घरी नव्हताच. सासू-सासऱ्यांपासून चार हात दूर राहूनच बोलत होती.
“अग! सुनबाई, कसे आहेत तुझे आई-बाबा.” मोठ्या आस्थेने सासऱ्यांनी तिला विचारलं होत.
“बरे आहेत!” तिचं त्रोटक उत्तर.
त्यांना तिच्या वागण्यात आज परकेपणा जाणवत होता. मधूनं यातलं कुणालाही काहीही कळू दिलं नव्हतं.
दिवस मावळतीला लागलेला. सर्व काही लयास गेलेलं. रात्र झाली. चांदण्याचा प्रकाश मंद झालेला. जेवणे आटोपली. घरातील मंडळी आपापल्या खोलीमध्ये झोपायला गेली. मधूची झोपच उडालेली. मनात विचारचक्र सारखे सुरु होते. काय करावे? कुणासाठी जगावे? कशासाठी जगावे? अनेक प्रश्नांच्या भडिमाराने तिचं डोकं गरगरू लागलेले. घरचे सगळे झोपी गेल्याचं पाहून ती हळूच उठली. तिने मनाचा निर्धार केलेला. तिला हे सारे काही थांबवायचे होते. प्रणय कडे लक्ष घातले. तो निद्राधीन झालेला. मुलाकडे पाहत तिनं त्याच्या चेहऱ्यावर हात फिरविला. त्याची पप्पी घेतली नि दारातून बाहेर पाऊल टाकत बाहेर पडली. तिचे पाऊल पटापट घरामागील विहिरीकडे वळलेले.... तिने कुठलाही क्षणभर थांबून विचार न करताच विहिरीत उडी घेवून जीवन यात्राच संपविली. मनमिळाऊ मधूविषयी सारा गाव हळहळत राहिला पण तिच्या आत्महत्याचे कारण कुणालाही कळले नव्हते. गावकरी कारणाच्या प्रतीक्षेतच राहिले......
सासू-सासरे तिचे आई-बाबा रडताना तिचा मुलगाही आई करिता टाहो फोडून रडत राहिलेला....आणि अंत समयी आलेली प्रीती त्याला कडेवर उचलून, आधार देत, भविष्य कालीन स्वप्नात रंगलेली......
कथाकार
पुनाराम वा. निकुरे तळोधी (बा.) ८४५९४४७७४९ / ९४०४१२११४०