भरारी
कांव.... कांव.. कावळ्याच्या कर्कश आवाजाने माझे लक्ष वेधले. समोर बघितले तर काय?
कावळ्याचे एक छोटेसे, काळेभोर धिटुकले पिल्लू ऑटो च्या टपावर ऐटीत बसले होतें, आपली मान उंचावुन
चहू कडे बघत होतें, जणू काही घरट्यातून एकटे बाहेर पडून त्याने मोठी लढाईच जिंकली होती.
कांव.. कांव चा आवाज अजून चढला म्हणून मी आवाजाच्या दिशेने बघितले तर एक कावळीण (बहुदा त्या पिल्लाची आई असावी )पिल्लाला साद घालीत होती, पण पिल्लू मात्र आपल्याच नादात होतें. कोणी कावळीचे ओरडणे इतके आर्त असू शकते हे प्रथमच त्या दिवशी जाणवले, एरवी कावळ्याचे ओरडणे नेहमी कर्कशच वाटायचे.
एव्हाना बरीच मंडळी ऑटो भोवती जमली होती.
ऑटोच्या ड्राइवर नें रिक्षा चालू केली. मात्र त्या बरोबर तें
पिल्लू घाबरले व तें बारक्या आवाजात मदती साठी ओरडू लागले.
कावळीच्या ओरडण्याचा आवाज आता बदलला होता, जणू काही पिल्लावर आलेल्या संकटात ती मदत मागत होती.
पांच मिनिटातच आठ.. दहा कावळे तेथे जमले व रिक्षा भोवती पिंगा घालू लागले, ड्राइव्हर नें मग ऑटो बंद केली व तो बाजुला झाला
आता सर्वांनाच ह्या गोष्टीत रस येऊ लागला होता.
बऱ्याच वेळ थांबून दोन कावळ्या व्यतिरिक्त सारे कावळे उडून गेलें. तें दोघे बहुदा पिल्लाचे आई वडील असावेत.
आई कावळीने घाबरलेल्या पिल्लाला आपल्या पंख्या खाली घेतलें व त्याच्या चोचीत एक दाणा दिला.
मी बाल्कनीतून सर्व बघत होतें.
आणि मग सुरू झाले पिल्लू चे ट्रेनिंग!!
दोन्ही मोठे कावळे कमी उंचीच्या मुंढेर वरून स्वतः खाली वर उड्या मारत होतें, जणू आपल्या बाळाला उडी मारायला शिकवत होतें.
बऱ्याच प्रयत्नानंतर पिल्लूला मुंढेर वरून उडी मारण्यात यश आले.
रिक्षा ड्राइवर ला ऑटो घेऊन जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
आता दोन्ही कावळ्यानी आपल्या पिल्ला सह मुंढेरवर
ठाण मांडले होतें.
कावळा पिल्लाला थोड्या उंचावर पंख पसरून उडायला शिकवत होतें तर आई आपल्या चोचीत दाणा आणून भरवत होती. त्याला आता कोणीच एकटे सोडत नव्हते, आसपास वावरणाऱ्या बोक्या पासून डोळ्यात तेल घालून त्याचे संरक्षण करत होतें.
हळू हळू तें पिल्लू उडणे शिकले. थोड्या उंची वर उडून तें परत घरट्यात यायचे.
मला त्यांचा हा खेळ बघण्याचा जणू छंदच लागला होता.
आणि..... एक दिवस सकाळी माझ्या डोळ्या देखत
तें पिल्लू आपले पंख फडकवत आकाशात भरारी घेत उडून गेलें
दोघेही कावळे मान उंच करून बघत होतें. मी त्यांच्या डोळ्यात झाकायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या डोळ्यातले भाव मात्र मला वाचता आले नाहीं.
कसले भाव होतें तें????
जीवन सार्थक झाल्याचे, पुत्र वियोगाचे, किं पिल्ला माघारी एकटे राहण्याचे भय??
त्याच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा मला उगीचच भास झाला!!
डॉ विद्या वेल्हाणकर
अंधेरी मुंबई