गाठी ऋणानुबंधाच्या
*गाठी ऋणानुबंधाच्या*
कितीतरी वर्षांनंतर सगळ्या मित्र-मैत्रिणींची गाठ पडली आणि मन भूतकाळात रममाण झालं किती छान भेटीगाठीचा हा योग....
काही गाठी अशाच गोड असतात,सतत जपून ठेवण्यासारख्या, यौवनातल्या सुरेख स्वप्नांच्या नाजूक रेशीमगाठी, ऋणानुबंधांच्या प्रेमळ गाठी, मैत्रीतल्या गोड गाठीभेटी,किंवा जीवन साथीदाराशी बांधलेली साता जन्माची लग्नगाठ असो.. अशा सुरेख,नाजूक, अलवार, धाग्यांनी बांधलेल्या गाठी नेहमी एकसंधच राहू देत ,चुकून अचानक, नकळत एखादा नाजूक धागा खेचला जायचा आणि त्याची न सूटणारी निरगाठ व्हायची कळायचंही नाही. अचानक अनेक दिवसांनी मैत्रिणीशी पडलेली गाठ कधी गळाभेट होऊन जाते कळतच नाही ,पण असं व्हायला समोरच्याच्या मनात सुद्धा तेवढेच प्रेम हवं ना ...आतल्या गाठीची माणसं आपल्या जीवनात आली ना की, अशा भेटीतच नवीन गाठ तयार होण्याचा संभव असतो. एखाद्याला मनापासून आपलं मानलं आणि मनाशी खूणगाठ बांधली की ही सगळी आपली माणसं आहेत तर जुळलेली नाती तुटता तुटत नाहीत ,पण कितीही जवळ करायचा प्रयत्न केला आणि समोरच्याला नको असेल तर नात्याची नाळ जुळता जुळता नाही.
ऋणानुबंधाच्या गाठीही अशाच,ना नात्याची ना गोत्याची अशी अनेक माणसं आयुष्यात येतात आणि आपल्या नकळत आपली होऊन जातात. त्या देवानंच बांधलेल्या गाठी म्हणायला हव्यात.
नात्यांमधल प्रेम,गाठ न पडता टिकवता आले तर संसार नक्कीच सुखाचा झाला म्हणून समजावा. प्रेमाच्या गाठी भलेही कितीही मोठ्या होवोत काहीच काळजी नाही.
शरीरातल्या गाठी काढता येतील हो, पण मनातल्या गाठीचं काय???ती बसली की बसली. म्हणून गाठी पडू दया,भेटी होत राहू दया......जीवनात गाठीभेटीचा आनंद घ्या🙂
...✍️सौ.मंजिरी भातखंडे
पुणे.
29/1/21