पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्लास्टिकच पाणी



    सकाळपासून धो-धो पाऊस कोसळत होता, वातावरण कसं छान थंड झालं होतं.' प्राणी पेशी आणि वनस्पती  पेशी' चा धडा मी वाचत होते. रात्रीचे अकरा वाजले होते, डोळ्यावर झापड येत होती माझ्या, पण काय करणार उद्या परीक्षा आहे अभ्यास तर करायलाच पाहिजे नाही का? ."बाळा झोप येते तर झोपून घे नाहीतर उद्या पेपर मध्येच झोपशील", आजी माझ्या खोलीत येत डोक्यावर हात फिरवत म्हणाली "हो जरा झोपते मी पहाटे लवकर उठेन"! मी खोलीतला दिवा घालवला आणि झोपी गेले.

         
   पहाटे चार चा अलार्म लावून लवकर उठले तेव्हा पण पाऊस सुरू होता जणूकाही आज त्याला जायचं नव्हतं. आई बाबा झोपले होते, मी पटकन तोंड हात पाय धुऊन अभ्यासाला बसले ,अभ्यास करायला पुस्तक उघडलं आणि लाईट गेली, एकदम काळा मिट्ट अंधार झाला. आई ,बाबा, आजी सगळे उठले ,पंख्याचा आवाज बंद झाला नुसता कोसळणारा पाऊस आणि घड्याळाची टिकटिक कानी येत होती .

 
  आईने लगेच मेणबत्ती पेटवली आणि माझ्या जवळ ठेवली, त्याच्या प्रकाशात आता मला अभ्यास करायचा होता. जुन्या जमान्यातली माणसं कशी या मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करायचे देव जाणे पण माझा नाईलाज होता.


   
   तेवढ्यात बाबांनी दरवाजा उघडला ,ते  शेजाऱ्यांशी    चौकशी करू लागले तेव्हा समजलं सतत कोसळणाऱ्या पावसामुळे विजेच्या डीपीत पाणी शिरलं त्यामुळे शॉर्टसर्किट झाले आणि पूर्ण शहराची लाईट गेली आता जेव्हा पाऊस थांबून पाणी ओसरेल तेव्हाच डीपी दुरुस्त करता येणार होता. मी त्या सगळ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा पुस्तकात डोके टाकू लागले. अर्धा तास चांगला माझा अभ्यास झाला मग अचानक तळमजल्यातल्या लोकांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. खूप गडबड गोंधळ सुरू होता, काय होतंय हे बघायला बाबा घराबाहेर गेले  तेव्हा तळमजल्यावरची  सर्व मंडळी वर येत होती. बाबांनी काय झाले हे विचारताच "अहो आमच्या घरात पाणी शिरले दोन तास झाले पाणी उपसतोय पण काहीच उपयोग नाही सगळं सामान भिजले हो पोरं बाळ घेऊन मग वर आलो शेवटी" ते काका थकलेल्या डोळ्यानी बाबांकडे पाहात म्हणाले या या सर्वजण बसा पाणी ओसरल्यावर करू काहीतरी आपण सगळे बाबा त्या काकांना धीर देत म्हणाले.


 
    आता काय माझा अभ्यास होईल असं वाटत नव्हतं, घर पूर्ण भरलं होतं, आई सर्वांना चहा आणि काही खायला देत होती. त्या लोकांसाठी फार वाईट वाटत होतं "आई पाणी पाहिजे" माझ्या शेजारी एक चिमुरडा बसला होता तो आईचा पदर खेचत म्हणाला "अहो जरा माझ्या लेकाला पाणी देता का" त्या बाईंनी माझ्या बाबांना सांगितलं बाबा लगेच स्वयंपाक घरात गेले आणि मडक्यातून पाणी काढत होते पण त्यात फक्त एक ग्लास भरेल एवढेच पाणी होतं .त्यांनी मडके उलटे केलं ग्लास भरला आणि त्या बाईना दिला बाईंनी लगेच पाणी आपल्या लेकाला पाजलं.


   आता आई बाबा दोघेही चिंतेत "घरात एवढी माणस आहेत पाणी संपले ,आता करायचं तरी काय ?मोठी माणसं कळ काढतील पण लहानांचा काय खाली जाता येणार नाही सगळीकडे पाणीच पाणी आणि प्यायला पाणी नाही"एवढआई म्हणाली आणि बाबांचा चेहरा खुलला जणू काही त्यांना काही मार्ग सुचला असावा बाबांनी खिडकीतून पावसाकडे पाहिलं आणि लगबगीने माळ्यावर चढले त्यांनी प्लास्टिकचे काही कागद व सुतळ्यांचे गुंडे काढले.
बाबा काय करतायेत आईला काही उमजत नव्हतं. बाबांनी शिडी काढली आणि चटकन गच्चीत गेले मग मि पण  बाबां मागे गेले .तेवढ्यात बाबानी  पाहिलं "तू कशाला आलीस गच्चीत एवढा पाऊस सुरू आहे भिजशील जा खाली"बाबा जोरात ओरडले ."बाबा थांबा ना मी रेनकोट घालते आणि तुम्हाला मदत करते तसं पण आता माझा अभ्यास काही होणार नाही तेवढीच तुमची मदत पण तुम्ही करताय काय" मी बाबांना मनवण्याचा प्रयत्न केला." बरं ठीक आहे ये इकडे" शेवटी बाबा तयार झाले


  मग बाबांनी मला प्लास्टिक कागदाच्या चारही कोपऱ्यांना सुतळ्या बांधायला सांगितलं, मी पटपट ते केलं .पावसाचा मारा इतका होता की माझ्या चष्म्यावर पावसाचे थेंब गर्दी करू लागले होते, ते बोटाने हलकेच सारून मी माझं काम सुरूच ठेवलं मग बाबांनी आईला कळशा आणि हंडे आणायला सांगितले त्यांनी गच्चीच्या चार कोपर्‍यात चार कागद बांधले ,त्या कागदांचे छप्पर झालं होते मग प्रत्येक कागदाच्या एका टोकावर वजनदार दगड  ठेवला आणि त्या प्रत्येक दगडाखाली एक एक हंडा आणि एक एक कळशी ठेवली.पावसाचं पाणी प्लास्टिकच्या कागदांवर पडू लागलं आणि दगडा वाटे कळशा आणि हंड्यांमध्ये साचू लागलं.

    पुढच्या पंधरा मिनिटांत चारही भांडी पाण्याने भरली. आई हे पाहून खूप खुश झाली,तिने लगेच दुसरी भांडी दगडाखाली लावली आणि भरलेली भांडी खाली घेऊन गेली. घरात गेल्यावर तिने त्या पाण्यात तुरटी फिरवली आणि पाणी उकळायला ठेवलं .तसं तर पावसाचे पाणी खूपच शुद्ध पण तरीसुद्धा आपल्या सवयीप्रमाणे त्याचे घरगुती शुद्धकरण केलाच पाहिजे नाही का?

    हा सर्व प्रकार घरात आलेली मंडळी कौतुकाने पाहत होते. त्यातल्या काहींनी मग बाबांना कामात थोडी मदत पण केली त्याक्षणी मला बाबांचं फार कौतुक वाटत होतं.


   चला पाण्याचा प्रश्न मिटला पण अजून पावसाचा जोर काही कमी होईना. सकाळचे दहा वाजले होते. पाऊस कधी थांबणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. माझी आजी तर लाईट गेल्यापासून देवाची माळ जपत बसली होती.आणखी एक तास पाऊस असाच सुरू  होता मग त्याचा जोर काहीसा कमी होऊ लागला आणि शेवटी तो बंद झाला .

    पाऊस थांबल्यानंतर नालेसफाईची काही माणसं येऊन गटारांची झाकून उघडू लागली,तसं पाणी ओसरायला लागलं .थोड्या वेळात पाण्याखाली गेलेला बिल्डिंगचा तळमजला डोकं वर काढू लागला घरात आलेली मंडळी स्थिरावली.आणखी दोन तासांत  पूर्ण पाणी ओसरलं घरात आलेली  मंडळी त्यांच्या घरी जाऊन साफसफाई करू लागली. संध्याकाळपर्यंत लाईट सुद्धा आली.

    चला तो दिवस संपला.माझ्या विज्ञानाच्या परीक्षे दिवशी ही अशी वेगळी नैसर्गिक विज्ञानाचे परीक्षा आम्ही दिली आणि त्यात माझ्या बाबांच्या हुशारीने उत्तीर्ण पण झालो.चला खूप झालं बोलून ,आता मी निवांत माझा अभ्यास करते कसला म्हणजे काय विचारताय....? परीक्षा व्हायचीये  अजून माझी नाही का...?

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू