अढी
अढी
ज्योती धनेवार- अलोणे
माझ्या बुटिकच्या बाहेर प्रमिलामँडम् गाडी पार्क करतांना दिसल्या आणि मी माझ्या हातातली हिशोबाची वही बाजुला ठेवली.... मँडम माझ्या फार जुन्या व नियमित कस्टमर होत्या ....... दर महीन्याला माझ्या बुटिक मधून त्यांची खरेदी असायची.... साड्या व ड्रेस खरेदी केले की ओघानेच ब्लाऊज व ड्रेसचे स्टीचींग बुटिक मध्ये व्हायचे. त्यामुळे त्यांची व माझी चांगलीच ओळख झाली होती,अगदी घरच्या गोष्टी बोलण्या पर्यंत.
पणगेल्या चार वर्षांपासून त्यांनी बुटिक मध्ये येणं कमी केले होते , नव्हे त्या आल्याचे आठवत नव्हते. प्रत्येक वेळी नवीन माल आला की मी त्यांना फोन करायची पण, दरवेळी त्या काही न काही कारणाने येण्याचे टाळत आहे हे माझ्या लक्षात आले . परंतु बुटिक मध्ये न येण्यामागचे कारण काही कळाले नाही. आज त्या आपणहून येतांना दिसताच मला मनापासून आनंद वाटला.
त्या आत येताचं मी हसुन त्यांचे स्वागत केले .म्हणाले , या ..बरेच दिवसांत येणं केलं मँडम् !
बुटिक मध्ये येणारी व्यक्ती ही कामानिमित्त आली आहे की सहजच भेटायला हे लक्षात येतेच! मॅडमही काही निमित्ताने आज वेळ काढून मला भेटायला आल्याचे मी ओळखले.....
हो ! बऱ्याच दिवसांत भेट नव्हती आपली.... आज शाळा जरा लवकर आटोपली म्हणून विचार केला की तुमची भेट घ्यावी , म्हणून सहजच या बाजूला आले...
त्यांच्या आवाजातील जडपणा माझ्या लक्षांत आला.काहीतरी यांच्या मनांत खटकत आहे हे समजायला वेळ लागला नाही. पण काय असावं ? मला प्रश्न पडला! ......मी त्यांना म्हटलं , मलाही तुमची नेहमी आठवण येत असते .... केव्हाही येत चला भेटायला, बुटिक आपलंच आहे ! थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा होत असतानाच ,कारागिर बसण्याच्या हॉल कडे नजर टाकून त्या म्हणाल्या , एखादी कारागिर मुलगी काम सोडून गेली तर तुमची अडचण होत असेल नाही ? नवीन कारागीर शोधावा लागत असेल तुम्हाला !
हो ! पण सहसा कोणी काम सोडून जात नाही ....कोणी लग्न होउन बाहेर गावी गेली तरच....
पण कां हो ! मी थोडं आश्चर्य वाटुन विचारले...
त्या कुणाबद्दल बोलत असाव्यात , हे माझ्या लक्षात आले होते . माझ्या कडे काही मुलीपण काम करायच्या ......त्यातील एकच मुलगी लग्न करून दोन वर्षांपूर्वी काम सोडून गेली होती !
अहो ' ती '! तुमच्या कडे होती ती !... गेली ना आता इथून पळून !
जी मुलगी काम सोडून गेली , तिचे नाव घेण्याचेही त्या टाळत असल्याचे माझ्या लक्षांत आले. त्यांच्या आवाजातला तिच्याबद्दलचा रोष मला जाणवला आणि बोलतांना चेहऱ्यावरील बदलणारे भावही स्पष्ट दिसले .
मी म्हटले,अच्छा ! नयना बद्दल बोलताय होय तुम्ही ? खरचं खूप हुशार आणि मेहनती होती ती मुलगी ! नवर्-याने दुसरा घरोबा केला म्हणून ही आईकडे रहात होती .... . आता लग्न झाले तिचे दोन वर्षांपूर्वी ! तुम्ही ओळखत होता का मँडम का तिला ? पण तुम्ही कधी तिच्याशी ओळख दाखविली नाही ! तिच्याबद्दलच्या त्यांच्या रागाचे कारण मला जाणुन घ्यायचे होते.
अहो , काय आणि कशाला ओळख दाखवायची तिच्याशी ! तिच्यामुळेच तर येणं बंद केले होते मी तुमच्याकडे . त्यांच्या शब्दांत तिच्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. ..
अहो ! खुप चतरी होती ती पोट्टी ! पदरात दोन पोरं होती तिच्या .नवऱ्याने सोडून दिले होतं आणि माझ्या भावाला आपल्या जाळ्यात अडकवलं तिनं , फसवलं माझ्या भावाला !
तिच्या बद्दलचा राग त्यांच्या शब्दातून व्यक्त झाला .
माझ्या सगळं लक्षांत यायला लागलं . फसवलं म्हणजे ? त्याची पण संमती असेलच ना !
हम् ! अहो चार ..पाच वर्षापासून माझा भाऊ इथे एम आय डी सी ला रोजंदारीवर नोकरीला होता .... शिक्षण जरा कमीच होतं ...... .कशी कोण जाणे दोघांची ओळख झाली ... .भेटायचे रोज.... . आता गेले तिकडे आमच्या गावाला ! गावाची सरपंच झाली म्हणे आता ती ...... संपूर्ण गावाची सत्ता आता तिच्या हातात आली !
अच्छा ! म्हणजे तिला भेटायला यायचा तो तुमचा भाऊ तर ! दुर गाडी उभी करून ,जोर जोरात हॉर्न वाजवायचा ! हार्नचा आवाज ऐकून ही काम सोडून तिकडे जायची अर्धा अर्धा तास गप्पा मारायला ! एकदा मी तिला हटकलेही होते की , कामाच्या तासानंतर भेटत चला ....... तेव्हापासून त्याने यायचे बंद केलं आणि मग काही दिवसांनी तिनेहीे माझ्या कडे काम करणे बंद केले ,काही कारण न सांगता . तिने लग्न केल्याचे बऱ्याच दिवसांनी कळलं मला .... पण एकंदरीत छान झाले ! आता तिला समजून घेणारा नवरा मिळाला , चांगले सासर मिळाले असे ऐकुन आहे.
हो ! तिला सासर मिळालं ..... पण....
माझं मात्र कायमचं माहेर तुटलं !
हे सांगतांना त्यांच्या डोळ्यात टचकन् पाणी आले .माहेर तुटल्याचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. तिच्यावरुन माझा व माझ्या भावामध्ये दुरावा निर्माण झाला . एकुलता एक भाऊ आहे मला .मी स्व:ताहुन संबंध तोडले तरीपण राखी व भाऊबीज आली की वाट बघते त्याच्या फोनची मनांत खोटी आशा धरून आणि आठवत बसते आम्ही भावाबहीणीने ऐकत्र घालविलेले ते सारे क्षण ! मनांला खुप त्रास होतो हो माझ्या!
ऐव्हढे प्रेमाचे तुमचे संबंध मग का हो तोडले ? मी त्यांना प्रश्न केला.
त्या सांगु लागल्या…. मला त्यांच ते नातं पसंत नव्हतं ! तो बिन लग्नाचा आणि ती दोन पोरं असलेली...ईथुन जाण्या अगोदर माझा भाऊ तिला माझ्याकडे घेऊन आला होता ,आम्ही लग्न करणार आहोत हे सांगायला ......मी तर चक्क नाही म्हटले त्याला ...... खूप बोलली मी दोघांना ...... भावाबहीणीचे संबंध तुटतील असंही सांगितलं त्याला.पण तो तिला गावी घेऊन गेला ......तिकडेच लग्न केले दोघांनी . माझे आई बाबाही असतात तिकडे गावी ! ,त्यांच्याजवळच गेले हे रहायला ! त्यामुळे मला माहेरी जाता येत नाही. माझ्या आईचे कौतुक चालू असते सुनेबद्दल , माझी सुन गावाची सरपंच झाली .....तिच्यामुळे मान वाढला आमचा गांवात ! भावाने शेतीत लक्ष घातलं ..... मोठी गाडी घेतली ...... भरभराट झाली वगैरे ..... आणि तिच्या मुलांना आपलेच नातु समजून त्यांची हुशारी सांगत बसते फोनवर .मला काही ते ऐकण्यात फारसं स्वारस्य वाटत नाही !
मी म्हटले, तुमच्या भावाने तिला स्वीकारले , तुमच्या आई वडिलांनीही स्विकार केला तिचा !... मग तुमच्या मनांत कां अढी ठेवताय तुम्ही ? तुम्हीही तिचा स्वीकार करायला हवा ! अभिमान वाटायला हवा तुम्हाला तिचा ! तिने स्व:ता बरोबर तुमच्या माहेरचा उध्दार केला ....... उद्दा गावाचाही विकास करेल . अहो , ऐव्हढी हुशार आणि कर्तृत्ववान भावजय मिळालीय तुम्हाला आणि हो ! आणि तुमचा भाऊही हुशार व समजदारचकी ! त्यानेही तिच्यातली हुशारी बरोबर ओळखली ! म्हणूनच तर दोघांनी मिळून भविष्याचे स्वप्न बघितले . आता त्यांच्या स्वप्नांना तुम्हीही शुभेच्छा द्यायला हव्यात . तिचं जीवन सुखी करण्यासाठी तुमच्या भावाने तिला आधार दिला , तीही तिचं कर्तव्य पार पाडते आहे, त्यांची भरभराट होते आहे तिच्या निमित्ताने ! अहो पद , प्रतिष्ठा , पैसा सगळचं मिळण्याचं स्वप्न पुर्ण करणार आहे ती.... कष्टाळू व गुणी मुलगी आहे, तुमच्या भावाचा संसार सुखी केला, तुमच्या आई बाबांची काळजी घेते ..आणखी काय अपेक्षा करायची. मला तर त्यानी घेतलेला निर्णय बरोबर वाटतो आहे. आपणही ऐक स्त्री आहो आणि ऐक स्त्री म्हणून तिच्या भावना आपणच जाणून घ्यायला हव्या नं ! काढुन टाकायला हवा तुम्ही तुमच्या मनांतला त्यांच्याबद्द्लचा रोष !
त्या म्हणांल्या, एव्हढे सहज, सोपे नाही हो ते !त्याने माफी मागून माझ्याशीबोलायला हवं! शेवटी मोठी बहीण आहे मी त्याची!
हो ना ! मग त्यांच्या भल्याचा विचार केला पाहिजे तुम्ही .... मोठ्या बहीणीने मोठेपणा घेतला आणि लहानाला क्षमा करुन जर नातं पुर्ववत होत असेल तर....तुम्हाला तुमचं हसतं खेळतं माहेर वापस मिळेल ... खरं की नाही!
त्या विचारात पडलेल्या दिसल्या!
खरचं हो ताई ! असा सकारात्मक विचार माझ्या मनांत कधी आलाच नाही हो ! भावाशी अबोला धरुन मी मनातल्या मनांत कुढत राहीले......... दोन पाउल पुढे सरकुन नात्यातील दुरावा कमी करण्याचा कधी प्रयत्नही केला नाही . ........ . त्यांच्या नात्याला दुसऱ्याच दृष्टिकोनातून बघितलं आणि तिचा द्वेष करत आले ......नाही नाही ते बोलले होते मी तिला आणि माझ्या भावाला आणि त्या गप्प झाल्या.
अहो असं पश्चाताप करून काही होणार नाही. आता हे संबंध तुम्हालाच सुधारायला हवे ! माझं बोलणं पटतयं न तुम्हाला ! असं म्हणतात,
* देखनेका नजरिया बदलोगे तो सोच अपने आप बदल जायेगी *
मॅडमच्या चेहऱ्यावर हसू उमटले,त्या म्हणाल्या ,कपडे सुंदर स्टीच करुन देता तुम्ही हे माहीत होतं मला, पण दुरावलेले मनंही जोडण्याचे काम तुम्ही ऊत्तम करू शकता हे आज समजले. जास्त शिक्षण घेतले म्हणजेच समजदारी येते हा समज चुकीचा आहे. आपल्या विचारातूनच ती दिसून यायला हवी !
अगदी बरोबर ! आता घरी जाऊन लगेच फोन करा तुम्ही तुमच्या भावाला ! येते आहे म्हणावं मी माहेर पणाला ..... अहो ! रक्ताच नातं आहे तुमचं..... असं सहजपणे नाही नं तोडता येणार !
ताई ! तुमच्याशी बोलुन माझ्या मनावरचं ओझं खूप हलकं झालं .....विचार करण्याची नवी दिशा मिळाली माझ्या मनांला....
मी शूभेच्छा देत त्यांना म्हणाली अहो ! माहेरी चार दिवस आनंदात घालवून या म्हणजे मनांतली सगळी..... अढी निघून जाईल.... आणि हो जाताना सर्वांसाठी मिठाई घेऊन जा सगळ्यांचे तोंड गोड करा. आता तुम्हाला दोन भाचेही आहेत बरं का !
धन्यवाद ताई !
अहो आभार कसले मानता! अनुभवातुन आलेल्या गोष्टी असतात या ! प्रत्येकाच्याच बाबतीत असं घडुन गेलेले असते. काहींच्या मनातला "ईगो "माघार घ्यायला तयार नसतो ,आणि मग संबंध दुरावतात. आपल्या मनाविरुद्ध काही घडले की,आपण फक्त आपल्याच बाजूने विचार करतो समोरच्याची बाजू आपल्याला नेहमी चुकीची वाटत रहाते आणि रागाच्या भरात आपण खूप काही बोलून जातो . पण जरा शांतपणे समोरच्याच्या मनाचा विचार करून आपण आपल्या विचारात बदल केला तर नाती सांभाळली जातात. आणि नात्यात आपोआप गोडी निर्माण होते !
त्या म्हणाल्या, माहेराहुन आल्यानंतर येईल मी नक्की तुमच्या भेटीला !
येतांना मँडमच्या कपाळावर आठ्या दिसल्या होत्या ,त्या जाउन आता ओठावर हसू
घेऊन त्या बुटिकच्या बाहेर पडल्या ******
जिवनाच्यां प्रत्यक्ष अनुभवांचा सार…….
अशा आणि अशाच प्रकारच्या प्रेरणा दायी कथा वाचण्यासाठी "ज्योतिर्मयी" पेज अवश्य फॉलो करावे.
*********************************