ए री मैं तो प्रेम दिवानी
ऐ री मैं तो प्रेम दिवानी-!!!!
--लेखक - विश्वनाथ शिरढोणकर, इंदूर, म.प्र. (९१९८९३१२५२४७)
-------------------------------
--- आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आणि तंत्रज्ञानाच्या मोहात आसक्त असलेल्या आजच्या पिढीला १००० -५०० वर्ष पूर्वीच्या काळात माणूस नावाचा प्राणी तंत्रज्ञानाविना काय आणि किती चमत्कार करत होता याची कल्पना करणं अवघडचं . मग त्या घटना त्या कथा वास्तव असो किंवा आख्यायिका . पण त्या त्या घटना किंवा दंतकथा सोडल्या तर त्या त्या व्यक्तीने केलेले कार्य मात्र ऐतिहासिक , चिरस्थायी आणि मौल्यवान ठरलेले आहे . त्यांचे मूल्यमापन देखील त्यांच्या कार्यानेच झालेले आहे .
----कशी लिहली असेल ज्ञानेश्वरांनी आपल्या विशीत ज्ञानेश्वरी ? ज्ञानेश्वरांचे सर्व चमत्कार बाजूला ठेवले तरी हा प्रश्न आम्हाला स्वस्थ झोपू देत नाही . तुकाराम सदेह स्वर्गात गेले ,हा वादग्रस्त मुद्दा बाजूला ठेवला तरी इतके संकट सोसून आणि परिस्थितीला तोंड देत कसे रचले असतील त्यांनी मनोभावे आणि भक्तिभावे इतके अभंग ? रामदासांच्या ' मनाचे श्लोक ' किंवा ' दासबोध ' हे देखील साहित्यच आहे . संस्कार घडविणारे सुसंस्कृत साहित्य असल्यां संतांमुळे मोठे झाले की , त्यांच्या या साहित्यिक कृतीमुळे ते ते संत मोठे ठरले ? हा प्रश्न उरतोच .
----ज्या काळात महाराष्ट्रात सर्व संतांनी काळाची गरज समजून , संत साहित्याची निर्मिती केली , त्याच सुमारास उत्तरभारतात देखील अनेक साधूसंत , विपरीत राजकीय परिस्थिती असूनही एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष करत ,सर्वसामान्यांमध्ये सामाजिक चेतना निर्माण करीत होते . गोस्वामी तुलसीदास यांच्या ' रामायण ' ने मुस्लिम राजकीय व्यवस्थेत मोगलाई अत्याचारामुळे त्रस्त हिंदूंना एकत्रितच केले नाही तर रामायण हा जगण्यासाठी आदर्श व्यवहाराचा आणि अस्मितेचा असा प्रश्न बनवून सोडला . त्याच सुमारास, सूरदास, कबीरदास, रैदास आणि विशेष म्हणजे मीराबाई हे देखील आपआपल्यापरीने हेच कार्य करत होते . यासर्वांची वैयक्तिक , कौटुंबिक , आणि सामाजिक परिस्थिती फारच वेगळी होती . पण सतत जीवघेण्या संघर्षांमुळे उपजलेल्या वेदनांमुळे यासर्वांची साहित्य निर्मिती श्रेष्ठतम होत गेली .
----मीराबाईचा संघर्ष फारच वेगळा होता . पुरुषसत्तात्मक समाजात , सनातनी कर्मकांडी , एका अंधविश्वासी आणि शाही परंपरांनी वळसा घातलेल्या राजघराण्यात , मीराबाईला आपल्याच घरच्यांचे आव्हान स्वीकार करावे लागले होते . राजघराण्याची शिस्त तिला ओझं वाटत होतं . त्या काळात उत्तरभारतात स्त्रियांना फार अत्याचार सहन करावे लागत होते . स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतेच . सर्व व्यवस्था पुरुषांसाठी होती . सतीप्रथा आणि त्याप्रथेला महिमामंडित करणे , घुंघट, स्त्रियांना कोणतेही अधिकार नसणे , स्त्रियांना कायम हीन समजणे , स्त्रियांची खरेदी विक्री होणे , स्त्रियांना वस्तू समजणे , इतरांना स्त्रिया भेट म्हणून देणे , आणखीनच काय तर स्त्रियांचे तलवारीशी प्रतीकात्मक लग्न लावणे . असले सर्व भयानक परंतु आज अकल्पनीय कृत्यांमुळे आणि असल्या पुरुषी दंडेलगिरीमुळे स्त्रियांचा संघर्ष कैकपटीने वाढलेला होता आणि तो जीवघेणा देखील होता . जौहर ( आपल्या सुरक्षिततेसाठी स्त्रियांनी सामूहिक रूपाने अग्नीत उडी देऊन आत्मदाह करणे ) सारखे भयानक प्रकार म्हणजे सामाजिक असंवेदनशीलतेचा कळस होता . पद्मिनीला अल्लाउद्दीन खिलजी समोर आरशात दाखविणे , इतकं असून देखील तिच्यावर तिच्यासोबत असलेल्या दोनशे स्त्रियांबरोबर ' जौहर ' ची वेळ येणे . सती प्रथा आणि जौहरला महिमामंडित करणे ही पुरुषसत्तात्मक समाजाची अरेरावी होती . वर हा उल्लेख समाजात त्या काळातल्या खच्चीकरण झालेल्या स्त्रियांची फक्त वेदना दाखविणे आहे . एकूण तो काळ स्त्रियांच्या घोर उपेक्षेचाच होता , हे सामाजिक वातावरण , आणि समाजात त्या काळात स्त्रियांची एकूण स्थिती समजल्या शिवाय मीराबाईची , परिस्थिति देखील आपण समजू शकत नाही .
-----मीराबाई ( सुमारे १४९८ ते १५५७ ) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू , गूढवादी कृष्णभक्त , वैष्णवभक्त परंपरेतील संतांच्या मांदियाळीत महत्वपूर्ण असे एक व्यक्तिमत्व . विशेष म्हणजे तिला आपले भजन स्वतःगाऊन दाखविण्याची आवड होती . एका हातात तानपुरा आणि एका हातात चिपळ्या घेऊन रस्त्यांवर नाचत नाचत कृष्ण भक्तीत लीन होणाऱ्या मीराबाईचे १२०० पेक्षा जास्त भजन आहेत . ही भजनं भारतभर तर प्रसिद्ध आहेतच पण यांचे जगभर अनेक भाषेत भाषांतर झालेले आहेत . या बहुतांश रचनांमध्ये मीराबाईने श्रीकृष्णासाठी (ईश्वरासाठी) असलेले समर्पित विनाशर्त प्रेम, विरह, वेदना, आपुलकी, निराशा, गाऱ्हाणे, इत्यादी व्यक्त केलेले आहे .
-----सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका राजपूत कुटुंबात मीराबाईचा जन्म झाला. वडील रतनसिंह हे मेडतिया जहागिरीचे राठौड आणि राव दूदाजी हे आजोबा. बालपणीच मातृवियोग झाल्यामुळे वैष्णवभक्त आजोबांच्या छत्रछायेत मीराबाईचे बालपण व्यतीत झाले . येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की मीराबाईबद्दल अनेक बाबी ऐतिहासिक दृष्टीकोनातून वादग्रस्त ठरतात पण यामुळे तिचे साहित्यिक मूल्य कमी होत नाही . आणि तिच्या भजनात असलेल्या प्रेम , समपर्ण , वियोग , विरह , आणि भक्ती यामुळे ती संतांमध्ये श्रेष्ठ होऊन गेली . यात तिच्यावर झालेल्या अन्यायामुळेच , तिला आणि तिच्या रचनांना व्यक्त होण्यासाठी तिनं केलेला संघर्ष वाखाणण्याजोगता आहे असे मला वाटते .
----एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून लहानग्या मीराबाईने आपल्या आईला विचारले होते, " माझा पती कोण होणार ? " गमंत म्हणून चिमुरड्या मीराबाईला तिच्या आईने कृष्णाच्या मूर्तीसमोर नेऊन उभे केले आणि म्हणाली , " हा तुझा पती ." याच सुमारास त्यांच्याघरी एक साधू येत असे , त्या साधुजवळ असलेली कृष्णाची मूर्ती मीराबाईला फार आवडू लागली होती , आणि आईने, ' कृष्ण हा तिचा होणारा पती आहे ' असं सांगितल्यावर मीराबाईने त्या साधूकडून कृष्णाची मूर्ती घेऊन स्वतः जवळ ठेवून घेतली . काही दिवसातच , ' तू ईश्वराला खुष ठेऊ शकणार नाही ' असं सांगून तो साधू मीराबाईकडून कृष्णाची ती मूर्ती परत घेऊन गेला . नंतर मीराबाई , ललिता या मैत्रिणीला आणि जयमल या चुलतभावाला घेऊन त्या साधूकडे गेली . तिथं मिराबाईने बघितले की साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारत नाही . आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली . दुसऱ्याच दिवशी त्या साधूने ती मूर्ती मीराबाईला परत केली . मग ती मूर्ती कायम मीराबाईजवळच राहिली . अशा प्रकारे मीराबाई ' मूर्तीप्रेमी ' बनली . तिनं या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावून घेतलं असं देखील सांगितलं जातं . मनोवैज्ञानिक द्रष्टीने बघितले तर आज देखील समाजात निर्जीव वस्तूंशी आपुलकी बाळगणारे अनेक व्यक्ती आपल्याला आढळतात . नुकतीच कळलेल्या एका माहिती प्रमाणे चीन या देशात अनेक लोक आपला एकटेपणा घालविण्यासाठी मोठमोठाल्या ' डॉल ' सोबत ठेवतात , आणि त्यांना माणसांप्रमाणे वागवितात , त्यांच्याशी संवाद देखील साधतात . नात्यांच्या अद्भुतपणाची ही गोष्ट आहे . एकाकीपणाचे एकेरी संवाद भावनांमध्ये वाहून व्यवहारात कठोरपणा आणू शकतात याचे मीराबाई हे फार उत्तम उदहारण आहे .
-------हळूहळू मीराबाई कृष्णाच्या मूर्तीमध्ये रमतं गेली . कृष्णाशी संवाद साधुलागली , कृष्णाशी प्रेम करू लागली . आणि यानंतर जे घडले ते सर्वश्रुत आहे . नवरा मेला , सासरी छळ झाला आणि मग , मीरा कृष्णाची दिवानी झाली , विरहिणी झाली , कवी झाली , विरक्त झाली , सर्वापासून अलिप्त झाली ,आणि संन्यासिनी झाली . हा तिचा प्रवास तिला संत बनवून गेला.
-समाजाने आणि साहित्याने तिला चिरविरहिणी असे संबोधन दिले . विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजनं देखील याची साक्ष देतात . तिने आपले कृष्णाबरोबर असलेले प्रेम लपविले नाही आणि वेळोवेळी ते आपल्या भजनांमधून जगाला ओरडून ओरडून ( गाऊन ) सांगितले . तिने आपला विरह देखील लपविला नाही . आयुष्यभर कृष्णाच्या भेटीची वाट बघितली . तिनं आपली निराशा देखील लपविली नाही
----- " जो मैं ऐसा जानती प्रीत किये दु:ख होय , नगर ढिंढोरा पिटती प्रीत न करियो कोय ! "
-किंवा - " ऐ री मैं तो प्रेम दीवानी मेरा दरद न जाने कोय "
-प्रत्येक वेळास तिने कृष्णाशी असलेले प्रेम लपविले नाही - " मेरे तो गिरधर गोपाल , दुसरा न कोय ! " या ओळी तिच्या अनेक भजनांमध्ये आपण बघतो .
-----मीराबाईचे लग्न लहानवयातच चित्तोडच्या राणासांगाचा पुत्र भोजराजशी ठरले होते . स्वतः:कृष्णाशी लग्न लावून घेतल्यामुळे मीराबाईला हा विवाहच मान्य नव्हता . म्हणून लग्नानंतर सासरी कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला . नव्या सुनेच्या हातून प्रसाद बनविण्याच्या आग्रहास तिने नकार दिला . इथूनच तिची बंडखोर वृत्ती समोर आली . आणि तिच्या या बंडखोर वृत्तीला आळा घालण्यासाठी सासरी अनेक कटकारस्थानं झाले . लग्नानंतर अल्पावधीतच , दिल्लीच्या बादशाह बरोबर झालेल्या एका युद्धात भोजराजची मृत्यु झाली . भोजराजची मृत्यू मीराबाईच्या आयुष्याचा एक टप्पा म्हणता येईल . क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरवात केली आणि दु:खाचे रूपांतरण अध्यात्मिकतेत झाले . कदाचित इथूनच कृष्णासाठी मीराबाईच्या भक्तीचे रूपांतरण समर्पणात देखील झाले असावे.
----- सुरवातीला मीराबाईचे कृष्ण प्रेम ही खासगी बाब होती . पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली . राजघराण्याच्या इभ्रतीला हे शोभेसे नव्हते . चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर या तिच्या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला . असं म्हटलं जातं की मीराबाईच्या या कृष्णप्रेमासाठी अनेक वेळा तिला संपविण्याचा प्रयत्न झाला . या विषयाबाबद वेगवेगळे मत आहे .
------आख्यायिकेप्रमाणे , मीराबाईवर विषबाधेचा प्रयोग केला गेला असं म्हटलं जातं . एकदा प्रसादात विष मिसळून मीराबाईला मारण्याचा प्रयत्न झाला , पण कृष्णाने प्रसादाचे अमृतात रूपांतरण केले . एकदा मीराबाईच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले . पण परत ईश्वरकृपेने ( कृष्णाने) खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीराबाईच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो .
--- " शूल सेज राणा ने भेजी ,दीज्यो मीरा सुलाय !
सांझ भई मीरा सोवन लागी , मानो फूल दियो बिछाय !! "
----- एका आणखीन आख्यायिका प्रमाणे , मीराबाईला फुलांच्या टोपलीत साप लपवून भेट पाठविली , आणि सांगितलं की ईश्वराने दिलेली तिच्यासाठी एक अप्रतिम भेट आहे . मीराबाईने जेव्हा टोपली उघडली तेव्हा मात्र तिच्यात तिला फुलांची माळ सापडली .
-वरील आख्यायिकांप्रमाणे मीराबाईबद्धल अनेक गोष्टी सांगितल्या जातात . वयाच्या सुमारे चाळीसाव्या वर्षी मीराबाईने राजस्थान सोडले आणि वृंदावनात गुरु रैदासांजवळ आली . काही काळानंतर मीराबाईने रैदास यांना आपले गुरु जाहीर केले , (" गुरु मिलिया रैदासजी " ) आणि वृदावन सोडले . मीराबाईने गुजरातच्या द्वारकेत शेवटचे वर्ष घालविले . एका किवंदंती प्रमाणे द्वारकेत मीरा द्वारकाधीशाच्या ( कृष्णाच्या ) मूर्तीत विलीन झाली .
-कृष्णप्रेमात वेडी झालेली ललिता गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असं मीराबाई मानू लागली होती व त्याप्रमाणे आचरण देखील करू लागली होती .
-----त्या काळात रूप गोस्वामी हे श्रेष्ठतम संत मानले जात होते . मीराबाईने त्यांच्याशी अध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे . ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही असा मीराबाईला प्रतिसाद मिळाला . यावर मीराबाईने त्यांना उत्तर दिलं ,' श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे .' आणि यानंतर संपूर्ण उत्तर भारतात आपल्या श्रीकृष्णाच्या प्रेमाची भजनं गातं फिरली . मीराबाईने श्रीकृष्णाबरोबर , स्वतःला अनेक नात्यांमधून बघितले . ईश्वर ,आराध्य , प्रेमी , पती , दासी , प्रसंगी विरह देऊन छळणारा . हा नात्यांचा गुंता ती अलगत सोडवीत देखील असे . आपल्या भजनात - मेरे तो गिरधर गोपाल - मीरा कहे प्रभू गिरधर नांगर -याचा ती नेहमी उल्लेख करीत असे .
-----एका आणखीन आख्यायिकेप्रमाणे ,' तू आता आपल्या कृष्णाजवळच राहा ' असं सांगून राणाने ( तिच्या दीराने ) तिला रात्रभर कृष्णाच्या मंदिरात कोंडून ठेवले . अंधाऱ्या रात्रीत सर्व गावाने बघितले , मंदिरातून खूप उजेड येत आहे . ही गोष्ट राणाला कळली तेव्हा तो ही आला . त्याने बघितले , मंदिरात एकच समयी होती पण आता अनेक समयी जळत होत्या . आणि मंदिरात वाऱ्याने आग भडकलेली होती आणि त्यामुळे बंद असलेला लाकडी दरवाजा जळून खाक झाला होता , मीराबाई दालनात मूर्च्छित होती . याच प्रकरणानंतर मीराबाईने राजस्थान सोडले होते .
-----मीराबाईच्या भजनांचा गोडवा वाढत जात होता . यावरून एक मात्र कळते की तिला संगीताचे देखील ज्ञान असले पाहिजे .तानसेनसारख्या गायकाने तिचे संगीत लपून ऐकले असे पण सांगितले जाते . इतकंच काय तर तानसेनच्या आग्रहावरून , तानसेन सोबत स्वतःची ओळख लपवून मीराबाईचे भजन ऐकायला अकबरने देखील आग्र्याहून द्वारकेपर्यंत प्रवास केला होता . पण मीराबाई आणि रामायणचे रचियता गोस्वामी तुलीसदासांची भेट बनारसच्या गंगाघाटावर झाली याचे प्रमाण मात्र मीराबाईच्या भजनात मिळते .
-" पायो जी मैने राम रतन धन पायो "
---- हेच भजन गाण्यासाठी अनेकांच्या आवडीचे भजन देखील ठरले . पळुस्कर , लता मंगेशकर ते अनुप जलोट सकट अनेकांच्या आवाजात हे भजन आपण ऐकलेले आहे.
----मीराबाईचे देवरजी ( धाकटा दीर ) राणाला विक्रमजीतसिंह नावाने ओळखले जात होते . आणि या दीराकडून मीराबाईच्या झालेल्या सतत छळामुळे मीराबाईला संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली असावी .
----साधारणपणे सर्वसामान्य लोक लग्न झालेल्या जोडप्यांच्या सुखी दाम्पत्य जीवनाची कल्पना करत असतात . याज बरोबर सासरी वैधव्य भोगत असलेल्या राजघराणातल्या मीराबाईसारख्या स्त्रीवर कोणत्याही प्रकारे यातनेची किंवा तिचा छळ होण्याची कल्पना समाज करत नसतो . असं आढळल्यास त्याची प्रतिक्रिया सतंप्त असून त्याचे पडसाद कैकपटीने जास्त उमटतात . पण मीराबाईच्या आयुष्याशी संबंधित काही इतिहास संमत तथ्य आणि पुरावे शोधून ऐतिहासिक वातावरण निर्मितीचा विचार स्वाभाविक असला तरी मीराबाईबद्दल निश्चित असं सांगता येत नाही . कारण मीराबाईबद्दल इतिहासात असलेले पुरावे काही वेगळं सांगतात आणि मीराबाईचे आयुष्य व तिचे साहित्य काही वेगळं सांगत असतं . म्हणून ऐतिहासिक पुराव्यांना मीराबाईच्या साहित्यावर आरोपित करण्यापेक्षा , तिच्या भक्तीची श्रेष्ठ गुणवत्ता , आणि भावनांच्या वेदना ज्या तिच्या काव्यात उमटल्या त्या गोष्टींकडे आपण लक्ष दिले पाहिजे . आपण सर्व वादग्रस्त विषयांना बाजूला ठेवून व मीराबाईच्या साहित्यावर आक्षेप न घेता तिच्या वेदनामय अंतरस्वरांना ऐकावे व बाह्य स्वरांना गुणगुणावे.
----अनेक समीक्षकांनी , साहित्यामध्ये मीराबाईला हिंदी भाषेतील पहिली स्त्रीवादी कवी मानलेले आहे .
----राजघराण्यात घुसमट होत असलेल्या मीराबाईने आपल्यापरीने स्त्री स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला . प्रियकराला भेटण्यास जर घुंघट आडवा येत असेल तर
---- "जो मैं ऐसा जानती प्रीत किये दुःख होय, नगर ढिढोरा पीटती प्रीत न करियो कोय "
किंवा, " घुंघटा मे आग लगा देती " म्हणणारी मीराबाई खूप धाडसी होती. जगण्याचे स्वातंत्र्य हे महत्वाचे आणि मीराबाईचे सर्व आयुष्य यासाठी लढा देण्यात गेले . तिच्या कृष्ण भक्तीला जेव्हा राणाकडून विरोध झाला तेव्हा खंबीरपणे राणाला सांगणाऱ्या मीराबाईचा राणाकडून फार छळ झाला होता . पण मीराबाई आपल्या कृष्ण प्रेमासाठी जगाशी भांडायला आणि सर्व सहन करावयाला जणू तयारच होती . इतकंच काय तर यासाठी ती राजघराण्यातले सर्व वैभव देखील सोडायला तयार झाली .
--" राणाजी म्हे तो गोविन्द का गुण गास्यां ! "
--राजघराण्यातली मीराबाई आपल्या एका पदात , रेशमी साड्या , हातातल्या बांगड्या , आणि पूर्णच शृंगार त्यागण्याचे वर्णन करते .
--" अब कोऊ कुछ कहो , दिल लागा रे
हंसा की प्रकृत हंसा जाणे , का जाणे नर कागा रे "
-वासनेमुळे पुरुष हे कावळया सारखे असतात , असं मीराबाई म्हणत आहे . पण कृष्णाच्या प्रेमात तिनं आपलं मन रमल्याचे कबूल केले . ज्या प्रमाणे ब्राह्मणांच्या गळ्यात जानवं असतं ते त्यांच्या शरीराला आणि मनाला देखील भिडतं त्याच प्रमाणे श्रीकृष्णाच्या प्रेमात तिचे तन आणि मन दोन्ही रमले . इथं जानव्याच्या उल्लेखाने मीराबाईच्या पवित्र प्रेमाची जाणीव होते .
---" तन भी लागा , मन भी लागा ,जो बामण गल धागा रे ! "
---- अभ्यासक जे मीरा बाईला स्त्रीवादी कवी म्हणतात ते बऱ्याच अंशाने खरं आहे .
कृष्णाच्या कल्पनेत सतत वावरणारी मीरा आपल्या रचनांमध्ये अगदी यशोदेसोबत देखील स्वतःचे संबंध स्थापित करून कृष्णाचे गाऱ्हाणे देखील करते .
--- " देखोरे देखो जसवदा मैयां तेरा लालना !" किंवा , " जसवदा मैयां नित सतावे कन्नैयां ! "
-तर गोपिका बनून सर्व गोपिकांना म्हणते , " जल भरन कैशी जाऊंरे ! "
---आणि आपल्या कल्पनेत प्रत्यक्ष कृष्णाला म्हणते -
---"कान्हो काहेकूं मारो मोकूं कांकरी ! "
---मीराबाईला राधाचे जास्त कौतुक . अनेक वेळा तिनं तिच्या काव्यात राधेचे वर्णन केले आहे . राधा तिला सर्वात जवळची वाटते .
--- " होरी खेलनकू आई राधा प्यारी हाथ लिये पिचकारी ! "
---मीराबाईच्या होळीच्या अनेक रचना आहे . त्यात कृष्णाला रंग न टाकण्यासाठी विनय करणे , लटक्याने चुनरी ओली झाल्याचे सांगणे , शुंगार रसाचे उदाहरण आहेत .तर होळीच्या दिवशी कृष्ण सोबत नसल्याने तिची वियोगी मनस्थितीचे आम्हाला दर्शन होते .
---"मत डारो पिचकारी ! "
--" भीजो मोरी नवरंग चुनरी ! "
-- " किन्हू संग खेलू होली , पिया तज गये है अकेली ! "
-- विरहात वेदनामय मीरा कृष्णाला आर्जव करते , तर वीज चमकल्याने स्त्री सुलभ भीतीने तिला कृष्णाची आठवण येते .
--" तुम बिन मेरी कौन खबर ले ! "
-- " बादल देख डरी हो , स्याम ! मै बादल देख डरी ! "
-- अशा या चिरविरहिणी मीराबाईचे १२०० पेक्षा जास्त भजन आज एक वैभव आणि धरोहर ठरलेले आहे . जागे अभावी सर्व साहित्याबद्दल लिहिणे शक्य नाही तरी मीराबाईच्या काही निवडक रचना येथे देत आहे .
------------------------------ -------------------------------------------------------------
(१)
---------
- पायो जी म्हें तो रामरतन धन पायो I
वस्तु अमोलक दी म्हारे सतगुरु , किरपा कर अपनायो II
जनम-जनम की पूंजी पाई , जग मे सभी खोवायो II
खरच न खूंटे चोर न लूटे , दिन दिन बढत सवायो II
सत की नाव खेवटिया सतगुरु , भवसागर तर आयो II
'मीरा ' के प्रभू गिरिधर नागर , हरख-हरख जग पायो II
------------
(२)
-------------
-तोसो लाग्यो नेह रे प्यारे , नागर नंद कुमार I
मुरली तेरी मन हरयो , बिसरयो घर्रव्यवहार !!
दीपक को जो दया नही , उडिउडि मरत पतंग I
'मीरा'प्रभू गिरिधर नागर मिले , जैसे पाणी मिलिगयो रंग II
---------
(३)
------
-म्हारो प्रणाम बांके बिहारी को
मोर मुकुट माथै तिलक बिराजे
कुंडल अलकां कारी को II 1 II
अधर मधुर धर बंसी बजावे
रीझ रिझावे राधाप्यारी को
या छब देख मगन भई मीरां
मोहन गिरिवरधारी को II 2 II
----------------------
(४)
---------
-करना फकिरी फिर क्या दिलगीरी
सदा मगन मे रहेना जी !!
कोई दिन गाडी , कोई दिन बंगला
कोई दिन जंगल बसना जी !!
कोई दिन हाथी कोई दिन घोडा
कोई दिन पैदल चलना जी !!
कोई दिन खाजान, कोई दिन लाडु
कोई दिन फाकम मुकाजा जी !!
कोई दिन ढोलीया , कोई दिन तलाई
कोई दिन भुयी पर लोटणा जी
मीरा कहे प्रभु गिरिधर नागर
आए पड़े सो सहेना जी !!
------------------
(५)
------
-मेरे तो गिरिधर गोपाल , दूसरा न कोई
जाके सिर मोरमुकुट मेरो पति सोई !!
तात मात भ्रात बंधु , आपनो न कोई
छांडि दई कुल की कानि कहा करिहै कोई
संतन ढिंग बैठि-बैठि लोक लाज खोई
चुनरी के किये टूक ओढ़ लीन्ही लोई
मोती मूंगे उतार वनमाला पोई !!
अँसुवन जल सींचि सींचि प्रेम बेली बोई
अब तो बेल फ़ैल गई आणंद फल होई
दूध की मथनियाँ बड़े प्रेम से बिलोई
माखन जब काढ़ि लियो छाछ पिये कोई
भगत देख राजी हुई , जगत देख रोई
दासी ' मीरा ' लाल गिरिधर तारो अब मोही !!
--------------
(६)
--------------
--गली तो चारों बंद हुई हैं, मैं हरिसे मिलूँ कैसे जाय।।
ऊंची-नीची राह रपटली, पांव नहीं ठहराय।
सोच सोच पग धरूँ जतन से, बार-बार डिग जाय।।
ऊंचा नीचां महल पिया का म्हांसूँ चढ्यो न जाय।
पिया दूर पथ म्हारो झीणो, सुरत झकोला खाय।।
कोस कोस पर पहरा बैठया, पैग पैग बटमार।
हे बिधना कैसी रच दीनी दूर बसायो लाय।।
मीरा के प्रभु गिरधर नागर सतगुरु दई बताय।
जुगन-जुगन से बिछड़ी मीरा घर में लीनी लाय।।
------------------------
(८)
---
-पग घूँघरू बाँध मीरा नाची रे।
मैं तो मेरे नारायण की आपहि हो गई दासी रे।
लोग कहै मीरा भई बावरी न्यात कहै कुलनासी रे॥
विष का प्याला राणाजी भेज्या पीवत मीरा हाँसी रे।
'मीरा' के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अविनासी रे॥
-----------------------
(९)
-------------------------
-जो तुम तोडो पियो मैं नही तोडू। तोरी प्रीत तोडी कृष्ण कोन संग जोडू ॥ध्रु०॥
तुम भये तरुवर मैं भई पखिया। तुम भये सरोवर मैं तोरी मछिया॥ जो०॥१॥
तुम भये गिरिवर मैं भई चारा। तुम भये चंद्रा हम भये चकोरा॥ जो०॥२॥
तुम भये मोती प्रभु हम भये धागा। तुम भये सोना हम भये स्वागा॥ जो०॥३॥
बाई मीरा कहे प्रभु ब्रजके बाशी। तुम मेरे ठाकोर मैं तेरी दासी॥ जो०॥४॥
-------------------------
(१०)
-----
चालो मन गंगा जमुना तीर।
गंगा जमुना निरमल पाणी सीतल होत सरीर।
बंसी बजावत गावत कान्हो, संग लियो बलबीर॥
मोर मुगट पीताम्बर सोहे कुण्डल झलकत हीर।
मीराके प्रभु गिरधर नागर चरण कंवल पर सीर॥
----------------
(११)
--------
-माई री! मैं तो लियो गोविंदो मोल।
कोई कहै छानै, कोई कहै छुपकै, लियो री बजंता ढोल।
कोई कहै मुहंघो, कोई कहै सुहंगो, लियो री तराजू तोल।
कोई कहै कारो, कोई कहै गोरो, लियो री अमोलिक मोल।
या ही कूं सब जाणत है, लियो री आँखी खोल।
मीरा कूं प्रभु दरसण दीज्यो, पूरब जनम को कोल।
--------------------------------समाप्त -----------------------------------------