पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर वेळापूर

भारतातील एकमेव असे "हरनारेश्वर महादेव मंदिर "  म्हणजेच " शिव पार्वतीचे  शिवशक्ती चे  एकरूप दर्शन घडवीणारे

"श्री अर्धनारी नटेश्वराचे मंदिर ".


   हे सोलापूर जिल्ह्यातील  माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे अति प्राचीन असे पुरातन मंदिर आहे.


माझ्या मोठया भावाने अरुण क्षीरसागर यांनी मला पंढरपूर दर्शनाला गेलो असता.
इथे जवळच " वेळापूर "मध्ये प्राचीन मंदिर आहे सांगितले आणि आम्ही लगेचच दुसऱ्या पहाटे जाण्यासाठी तयारी केली.
या वेळी आमचा भाचा " उमेश आगावणे " हाही आमच्या सोबत होता.
त्याने आम्हाला  फोटो व्हिडीओ काढण्यासाठी खूप मदत केली.


" वेळापूर "  हे आळंदी-पंढरपूर या
 "श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज"  यांच्या पालखी मार्गावर वसलेले एक ऐतिहासिक गांव आहे.

या गावापासून श्री क्षेत्र पंढरपूर हे केवळ ३२ कि.मी. असून,

श्री क्षेत्र सिद्धरामेश्‍वर (सोलापूर)
१०० कि.मी.,
श्री क्षेत्र तुळजापूर १५० कि.मी.,
श्री क्षेत्र स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट १५० कि.मी., अंतरावर आहे.
या मंदिराचे हेमाडपंथी वास्तु-पद्धतीचे  बांधकाम असून यादव राजा रामचंद्र (१२७१ ते १३१०) यांच्या बद्दलचे शिलालेख या देवळाच्या भिंतींवर कोरलेले आहेत हे पहायला मिळते.


  संस्कृत भाषेत असणाऱ्या या शिलालेखांत देवराव यांच्या नावाचा उल्लेख आहे
श्री अर्ध नारी नटेश्‍वर वेळापूर ग्रामदैवताची यात्रा चैत्र पौर्णिमेस होते असे ग्रामस्थानी सांगितले . शुद्ध पंचमीस हळदी, अष्टमीस लग्न व पौर्णिमेस वरात आणि वद्य अष्टमीस सोळावी असा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो.

 यादवकालीन मंदिरामुळे वेळापूरला अनन्य साधारण महत्व आहे.
मंदिरासमोरच पाण्याचे एक मोठे कुंड आहे. बाराही महिने यामध्ये पाणी असते.
या कुंडात आता बरेच कासव ही सोडण्यात आलेले आहेत.


डाव्या बाजूला एक गोमुख असून पहिल्या पायरीजवळ एक शिलालेख कोरलेला आहे. यामध्येच उजव्या बाजूला असणाऱ्या   पाच-सहा मंदिरांमध्ये नागदेवता, गणेश यांच्या मूर्ती आहेत, तर डाव्या बाजूला एक छोटेसे मंदिर असून त्यामध्ये एक पिंडी आहे. मंदिरातील बहुतांशी मूर्ती पुरातत्त्व खात्याने जवळच बांधलेल्या संग्रहालयात आहेत.

 संग्रहालयातील काही मूर्तींवर हात फिरवला - अथवा - टिचकी मारल्यास सप्तसूर निघतात असे काहींचे म्हणणे आहे.

मुख्य दरवाजासमोरच एक नंदीची सरासरी आकारमानापेक्षा मोठी मूर्ती आहे. गाभाऱ्यातील दरवाजावर "गजलक्ष्मी" कोरलेली आहे व हे सुद्धा आपल्यामध्ये एकमेव असा उल्लेख करण्यासारखे आहे. कारण शक्यतो मंदिराच्या - गाभाऱ्याच्या दरावाज्यावर गणपती कोरलेला असतो. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर भग्नावस्थेत अजूनही उभे आहे.

 आसपासच्या अनेक मंदिरात वेगवेगळ्या आकाराच्या अनेक पिंडी आहेत. मंदिरातील मूर्ती अतिशय देखणी असून तत्कालीन कलेचा एक अद्वितीय नमुना म्हणता येईल. पांढऱ्याशुभ्र वस्त्रात असणारी ही मूर्ती असून मूर्तीच्या वरील भागात - गोलाकार - सप्तऋषींच्या प्रतिमा कोरलेल्या असून मध्यभागी कीर्तिमुख आहे.

 पार्वतीच्या पायावर एक चक्र आहे तर पायाच्या बाजूला गणपती, एक पुरातन ऋषी यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. आता त्या जीर्ण दिसतात.

देवगिरीच्या यादवांच्या काळात वेळापूर प्रामुख्याने भरभराटीस आले असावे .

आता मात्र
खूप वर्षापूर्वी वेळापूरचे स्थान जसे असेल तसेच आता असेल तर  बिलकुल नाही.

पूर्वी यादवांच्या काळापर्यंत वेळापूरचे नांव एकचक्रनगर असे होते. महाभारताचा कालावधी पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्याकाळी दक्षिणेकडचा भाग हा दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता. यावरूनच वेळापूरचा भागही दंडकारण्यात समाविष्ट होता आणि या दंडकारण्यात अनेक ऋषी-मुनींनी तपश्‍चर्या केली आहे. म्हणजेच फार प्राचीन काळापासून ही भूमी तपोभूमी, पावनभूमी अशी आहे. शांडिल्य ऋषीसह अनेकांनी येथे तपश्‍चर्या केली आहे असे परंपरा मानते.

महाभारत ते यादवकाल या कालावधीमध्ये वेळापूरबाबतचे पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र यादवकालापासून इ.स.१३०० पासूनचे पुरावे येथे आढळतात. देवगिरीची दक्षिण सीमा म्हणजे वेळापूर. वेळ म्हणजे सीमा. पूर म्हणजे भोवती तटबंदी असलेले गांव. यावरून वेळापूर हे नांव या गावास यादवांच्या काळातच मिळाले असावे असे वाटते. माणदेश व इतर भागावर लक्ष ठेवण्यासाठी वेळापूर येथे उपराजधानीप्रमाणे यादवांचे लष्करी ठाणे होते व यादवांच्या वतीने या ठाण्याचा कारभार बाईदेवराणा हे पहात होते. एक मध्यवर्ती लष्करी ठाणे म्हणून वेळापूरला अनन्य साधारण महत्त्व होते. त्या काळात सर्वच दृष्टीने वेळापूर भरभराटीस आलेले होते.  येथील श्री अर्धनारी नटेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला होता .

या मंदिराचे जीर्णोद्धार संकल्पक बाईदेवराणा होते.  स्वतःच्या अधिकारात त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. शिलालेखातील उल्लेख पाहता पूर्वी हे मंदिर होते. पण स्वरूप छोटे म्हणजे मुख्य गाभारा, गाभाऱ्यात पिंड व आतील नंदी, तो ही उघड्यावर एवढेच असावे. नंतर सर्व बाजूंनी जीर्णोद्धार झाल्यानंतर बाहेरच्या नंदीची प्रतिष्ठापना केली असावी. कारण इथे कोणत्याही महादेवाच्या मंदिरासमोर दोन नंदी नाहीत परंतु इथे आहेत हे वैशिष्ट्य आहेत .

माझ्या ऐकण्यात असे ही आले आहे कीं
मार्च २०१६ मध्ये महसूल प्रशासनाने या मंदिराला अतिक्रमणाची नोटीस बजावली असे काहींचे म्हणणे आहे.
पर्यटनदृष्ट्या, सोईसुविधांच्यादृष्टीने वेळापूर अतिशय दुर्लक्षित राहिल्यामुळे जास्त दुर्लक्षित होत आहे.
पुरातत्त्व खात्याकडून काहीच हालचाल होत नाही हे दिसून येते.अनमोल ठेवा या अवस्थेत  पाहून मन खिन्न होत आहे...


असो
आपण एक पर्यटक, म्हणून नक्कीच आपल्या पुरातन ऐतिहासिक मंदिरे, पाहावी.

व लोकांना जागृत करावं

ही छोटीशी इच्छा ????

ॐ नमः शिवाय ????


श्री.लव गणपत क्षीरसागर

मोबाईल : 9867700094



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू