अलक
प्रतिक्षा
दोन दिवसांपासून फार वाईट स्वप्न पडत होती. उगाचच मनाला हुरहुर लागून राहिली. आणि अचानकपणे बाबांचा फोन आला.
समोरून आपुलकीच्या स्वरात विचारलं गेलं..
" बाळा कशी आहेस ?आठवण येते गं !
" मार्च एंडिंग आहे ना बाबा येतेच एक दोन दिवसात भेटायला….".
" ये वाट बघतो तुझी!". गर्दी बघून हृदयाच्या ठोका चुकला आणि कुणाचे तरी शब्द कानावर आले,. "मुलगी यायचीय. श्वास तग धरून आहे…".
उघडे डोळे एक क्षण लकाकले… आणि…
प्रतीक्षा संपली होती....
किनारे
" खरी गोष्ट तरी ही आहे सोनू ,नंतर तू मला कधी समजून घेतलंस ना मी तुला…. दोघांचे विचार कधी जुळलेच नाही रे..!
आपली मन म्हणजे नदीचे दोन किनारे आहेत ते कधीच एकत्र येत नाही आणि आता तर आपल्याला एकत्र आणण्याचा कोणता दुवा शिल्लक राहिलेला नाहीये…. तू तुझ्या मार्गाने जायला मोकळा आहेस!
मळभ
खूप दिवसांनी आज मनावरच मळभ दूर झाल्यासारखं वाटतंय. गैरसमजाच्या कड्या कोयंड्या गळुन पडल्यात. मी हळुच मनाच्या पोकळीत पुन्हा डोकावून बघितलं, 'अजून कोणी राहिलयं का आत म्हणून……आत एक शंकेच पिल्लू चिवचिवाट करत होतं …मी त्याला हळुवारपणे अलगद उचलून बाहेर काढलं… आणि म्हंटलं
"आता तुला या जागेत थारा नाही.. 'तो' माझ्याकडे पुन्हा परत आलाय!!!
आनंद
"वसुंधरा ,अगं वटपौर्णिमेला येणाऱ्या तुझ्या वाढदिवसाला काय गिफ्ट हवयं तुला ?
" अहो , आपण दोघे मिळून ना, समोरच्या प्रांगणात एक वटवृक्षाचं रोप लावून त्याची जोपासना करूयात, म्हणजे आम्हा दोघीही वसुंधरेचा आनंद द्विगुणीत होईल!
नियती
"दोन ओडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ!"
माझ्यापासून दूर जाताना या दोन ओळी तू मला ऐकवल्यास…
नियतीने लगेचच आपली पुन्हा भेट घडवून आणली..पण तोपर्यंत या ओंडक्याचे कुणा लाकुडतोड्याने तुकडे तुकडे केले होते..
सौ.ज्योती अलोणे…