मी अयोध्या बोलतेय
मी अयोध्या बोलतेय.
माध्यान्ह प्रहरी
अयोध्या नगरी
रामावतारी
जन्मला श्रीहरि
राम जन्मला सखे राम परतला.
जनमनांत अवतरला सखे,
जनमनांत जागला.
ऑं! हे मी काय ऐकतेय!माझ्या
कर्णपटलावर ह्या मधुर..मम.प्रिय ध्वनी लहरी कुठुन येत आहेत? मी ऐकतेय ते खरंच आहे का? शरयू ! ए शरयू! जे मी ऐकतेय ,तूही ते ऐकते आहेस का ग! अग ssबाई! तुझ्यात उठणा-या..उचंबळणा-या या आनंदलहरीच सांगतायेत हं! म्हणजे हे खरं आहे तर! माझा रामलल्ला येतोय तर!
अहो! काय म्हणताय! मी कोण? मला ओळखलं नाही? अहो मी अयोध्या नगरी... त्रेतायुगातली अवधपुरी... रामजन्मभूमी...!
रामलल्लाची परतण्याची बातमी ऐकल्यापासून माझं हृदय...मन.. आनंदाने ओसंडून वहातय... रामलल्लाच्या आठवणींनी मनगाभारा,माया..ममता..प्रेमाने उचंबळतोय., तुडुंब भरलाय. माझ्या.डोळ्यासमोर, रामबाळाच्या जन्मसोहळ्या पासूनचे चित्र भराभर सरकतंय ! जणू. चलचित्रच !
माध्यान्हीला..चैत्रनवमीला. माझ्या मातीत..कौसल्या राणीच्या कुशीत रामबाळ जन्मला.ते नगारे तुता-यांचे पडघम..सनई चौघड्यांचे गजर ,माझ्या आजही कानात वाजत आहेत.त्यावेळी तर सारी सृष्टी आनंदली होती. चैतन्याने भारली होती. वनीवनी कुमुदिनी फुलल्या होत्या. वसंत ऋतु बहरला होता. रामाच्या स्वागतासाठी पळस बहाव्याच्या फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या .वृक्षवल्ली कोवळ्या पालवीने नटल्या होत्या...कलिका गालातच. खुदकन् हंसत होत्या. कोकीळेचे मधुर कूजन चालू होतं.. आंबा मोहरला होता.सुगंधाची लयलूट करीत होता. सूर्यदेव अधिकच दैदिप्यमान भासत होता. शरयू आनंदाने गात होती...अवखळ बाला झाली होती.राजप्रासाद तर आनंद..हर्षोल्लासाने भरून गेला होता.माझा कण नी कण आनंदाने फुलला होता..मोहरला होता. प्रजाजन आनंदात धुंद झाले होते. आनंदी आनंद गडे...जिकडे तिकडे चोहीकडे...!
राम बाळ शुक्लेंदुसारखा कलेकलेने वाढू लागला. त्याच्या पायातील वाळ्यांनी राजप्रसाद रूणुझुणु लागला... बाललीलांनी महाल आनंदु लागला ..त्याचे बालहट्ट पुरविण्यात मौज वाटू लागली. नी त्याचा तो चंदामामासाठीचा हट्ट!
माझे बाळराजे मुसमुसत होते...रूसले होते..हिरमुसले होते.कौसल्या राणीचा नी माझाही जीव कासावीस होत होता. अखेर आरसा दाखवून ,रामाला चंदामामा जवळ आणून दिला नी तो आनंदला. टाळ्या वाजवू लागला. किती निरागस दिसत होता तो!
सुमुखी..लोभस..गोंडस...श्यामवर्णी...कमलनयनी..सुकोमल . मनमोही..राम माझ्या मातीत कुशीत खेळत असे तेव्हा मला कृतकृत्य वाटत असे.
बाळराजे गुरूकुलात विद्या ग्रहणासाठी जायला निघाले तेव्हा माझ्याही मनाची खूप घालमेल झाली होती.पण सर्व विद्येने युक्त...धनुर्विद्येत ...राजविद्येत...प्रवीण होऊन आला तेव्हा कोण आनंद झाला होता. विश्वामित्र ऋषींनी जेव्हा यज्ञ संरक्षणासाठी राक्षसांना मारण्यासाठी वनात नेले तेव्हा कौसल्ये समवेत सगळ्यांनाच सुकुमाराची काळजी वाटली. पण यशस्वी होऊन आला तेव्हा अभिमानाने ऊर भरून आला हो!
जनककन्या जानकी...मैथिली... सीता...जेव्हा श्रीरामासोबत त्याची वधू म्हणून प्रवेश करती झाली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मी माझ्या ममतेच्या मायेच्या .. पायघड्या अंथरल्या होत्या.देखणी...लावण्यवती...सुकोमल..सुकेशा...सोज्वळ..सुहासिनी..जानकीची नी रामाची जोडी लाखात एक होती हो! अशा पुत्रवधुला मुहदिखाई म्हणून माझे हृदयच मी दिले. जानकीच्या आगमनाने राजप्रसाद चैतन्याने..आनंदाने उजळला.
रामलल्लाचा राज्याभिषेक करायचे ठरले तेव्हा सगळे किती आनंदले होते. उत्साहाने तयारीला लागले होते . पण रामाला चौदा वर्षे वनात पाठवा या कैकेयीच्या वर मागण्याने मी तर पार हादरलेच.
सर्वत्र दुःखाचा माहौल तयार झाला. पण रामाने वडिलांनी दिलेले वचन पाळले. पत्नीसीता नी बंधु लक्ष्मणासमवेत तो वनात निघून गेला. वल्कलं धारण केलेल्या श्रीरामाला पहावत नव्हते
हो!
वनात सीताहरण घटना.. रामाचे वृक्षवल्लरींना तिच्या विषयी विचारणे... सीते सीते म्हणून आर्ततेने पुकारणे..मन हेलावत होते. पण हनुमानाच्या मदतीने रावण वध करून सीतेसह चौदा वर्षांनी परत आला तेव्हा जीव भांड्यात पडला. प्रजेने गुढ्या तोरणे उभारून..रंगावल्या काढून छान स्वागत केले.
सीतेला बाळाची चाहूल लागली पण लोकापवादाने तिला वनात सोडावे लागले तेंव्हा
त्याची मनाची घालमेल पहावत नव्हती .पण तो लोकप्रिय ..प्रजाहितदक्ष राजा होता ना! सर्वांना समान वागणूक होती. प्रत्येकाला मनांत असलेले बोलायचा अधिकार होता. .रामराज्य होते ना ते!
पुढे त्याच्या पुत्रांनी रामायण गायले तेव्हा माझा कण नी कण पुलकित झाला होता.
मधल्या काळात जणू मी सुन्नावस्थेत होते. ना माझा श्रीराम होता.. ना तो त्यांचा प्रासाद.. माझ्या जीवनात " रामच" उरला नव्हता.
पण आता मी जे काय ऐकले आहे...माझा राम परत येतोय... ऐकूनच मी खडबडून जागी झाले आहे. माझा रामलल्ला परत येतोय. त्याच्यासाठी भव्य...दिव्य..नव्य असे मंदिर बांधून तयार आहे. डोळ्यांचे पारणे फिटेल अशी नक्षकारी मंदिरावर केली आहे. मी ही आधुनिकतेचे सजले आहे. नवनवीन प्रशस्त रस्ते ... चौकाचौकात आधुनिक शिल्प... पुष्करणी... उद्याने... स्वच्छता....सगळेच सुंदर !रामायणकर्त्या वाल्मीकी ऋषींच्या नावाने सुसज्जीत विमानतळ... आधुनिक सोयींनी सज्ज रेल्वे स्टेशन.. नवनवीन गतिमान रेल्वे गाड्या... लोकांच्या सोयीसाठी आधुनिक निवास व्यवस्था... खूप सजलेय मी! बाजारपेठा अगदी फुलुन गेल्यात. रघुवीर राम..रघुनंदन राम येणार नी त्यांच्या मागोमाग समृद्धी येणार. रामभक्तांची दर्शनासाठी रीघ लागणार. व्यापार उदीम वाढला की आर्थिक उलाढालही वाढणारच न! मग सुख शांती ही येईलच की! रामराज्य म्हणतात ते हेच न! श्रीराम भक्तांची अनन्य भक्ती., दर्शनाची ओढ... श्रीराम दैवताचा अभिमान... काय नाहीये?. तेव्हा
तर तो चौदा वर्षांनी परत आला होता. आता तर तो पांचशे वर्षांनी परत येतोय. म्हणूनच पूर्ण भारतवर्ष आनंदाने उत्साहाने फुललय. श्रीरामसेवेची एकही संधी कोणी सोडत नाहीय. आप
आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्यात धन्यता मानत आहे.
रामराजे सीतामाई नी बंधुंसह येत्या २२ता.जाने.ला,म्हणजेच पौष शुद्ध द्वादशीला भव्य दिव्य मंदिरात प्रतिष्ठापित होत आहेत. पूर्ण भारतवर्ष माध्यान्हीला घराघरात श्रीराम ज्योत प्रज्वलीत करणार आहे . घरोघरी रोषणाई..फटाक्यांची आतिषबाजी करून...पणत्या पेटवून माझ्या रामलल्लाचे स्वागत करणार आहेत. पुन्हा नव्याने दिवाळी साजरी होणार आहे. मनामनातील श्रीराम ख-या अर्थाने जागा होणार आहे. हृदयातील रामाची भक्ती ...श्रद्धा...अतूट विश्वास... उजागर होणार आहे.
शंखध्वनी... टाळमृदुंगाचा गजर...भक्ती.. श्रद्धेचा जागर... नव्याने होणार आहे त्याचे पडघम आतापासूनच माझ्या कानात घुमु लागले हो! आता अगदी थोडीच प्रतीक्षा आहे.माझा राजाराम..एकवचनी...सत्यवचनी.न्यायप्रिय...संयमी..प्रजाहितदक्ष ..मर्यादा पुरूषोत्तम...रघुवीर रामराजा प्रतिष्ठापित होत आहे.. मग पुन्हा रामराज्य येणार यांत शंका..नवल ते कोणतं!
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.
मो.नं.7020757854
्