कृतघ्न
कृतघ्न आहेत ते सारे
बेईमान आहेत ते सारे
जे म्हणतात --
हे स्वातंत्र्य मिळाले अहिंसेने !
हे स्वातंत्र्य मिळाले शांततेने !
रक्ताचा थेंबही न सांडता !!
मी त्यांना विचारतो ---
मंगल पांडेच्या मंगल हस्ते आरंभलेल्या
सत्तावनच्या यज्ञातील आहुती
काय रुधिराच्या नव्हत्या ?
इंग्रजांच्या नाकात दम आणणाऱ्या
वासुदेव बळवन्तांच्या धमन्यातून
काय पाणी वाहत होते ?
जगाच्याही इतिहासात तोड नसलेल्या
चाफेकर बंधूंच्या बलिदानाला तुम्ही विसरलात ?
होय ! होय, तुम्ही विसरलात
मदनलाल धीन्ग्राच्या गुरूला ,
सुभाषचंद्रांनाही स्वातंत्र्याचा मार्ग दाखविणाऱ्या
क्रांतिकारकांच्या सम्राटाला -
स्वातंत्र्य-वीर सावरकरांनाही तुम्ही विसरलात !
आझाद ,भगतसिंग , राजगुरू,
अश्फाक , खुदिराम , सूर्यसेन ,
कान्हेरे. पिंगळे , सुखदेव ,
हरदयाळ , रासबिहारी, खानखोजे,
आणि हज्जारो हज्जारो क्रांतीवीर
ज्यांनी स्वातंत्र्याची पहाट दाखविण्यासाठी तुम्हाला
कवटाळले फाशीचे दोर ,
त्यांची नावे घेतांना
तुमच्या जिव्हांना विटाळ होता काय ?
मग नका उच्चारू ती नावे
(कारण ती उच्चारण्याचीही तुमची लायकी नाही )
पण लक्षत ठेवा ---
म्हातारीने कोंबडं दडवल , म्हणून,
सूर्य उगवायचा थांबत नाही !
आणि ---
स्वातंत्र्याचा खरा इतिहास
दडवण्याचा प्रयत्न केलात ,
तर, ---
इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही !
इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही !
कवी-- अनिल शेंडे