निंदक नियरे राखिये
आज सायलीचे मन अभ्यासात लागत नव्हते, मूड जरा खराब होता. सायलीच्या ट्यूशन टीचर मीतूने विचारलेच, "काय गं सायली, एक पण प्रश्न सोडवला नाही अजून! लक्ष कुठेय तुझं? काही झाले आहे का?"
"आज टीचर उगाच रागवले, माझी चूक नव्हतीच.
माझी मैत्रिण बोलत होती आणि टीचरने मला पण शिक्षा (ती पनिशमेंट म्हणाली) दिली… ह्याला काय अर्थ आहे?" इति सायली.
ती खूप रागाने बोलत होती.
आज सायली सारखी बरीच मुलं आपल्या आसपास आहे, ज्यांना रागावलेलं सहन होत नाही. काही दशकांपूर्वी आपण जेव्हां लहान होतो, "रागवणे" हे आपल्या साठी खूप सामान्य होते… लहान-सहान गोष्टी वर… चूक असतांना किंवा कधी- कधी नसतांना पण घरातील वडीलधारी माणसे रागवायची. तीच काय तर शेजारी पण हक्काने रागवायचे. आणि शिक्षकांना तर रागावण्याचे, शिक्षा देण्याचे सारेच हक्क होते.. पण आपण ओरडा खाऊन लगेच 5 मिनिटांनी विसरून जायचो. त्याला एवढे चघळत बसत नव्हतो.
आजकालच्या मुलांची सहनशक्ती फार कमी होत चालली आहे, त्यांच्यात खूप लहान असतांनाच अपमान वगैरे भावना आल्या आहेत.
आणि म्हणूनच मोठे झाल्यावर बॉस किंवा सासरच्या मंडळीचे बोलणे किंवा रागावणे ते सहन करून घेत नाही.
मुलांना कोणी रागावलेलं पालकांना पण हल्ली सहन होत नाही…
याचा गंभीर परिणाम त्यांच्या करियर आणि कौटुंबिक जीवनावर होतो. कितीतरी तरुण डिप्रेशन मधे जातात.
खरंच रागावणे किंवा मोठ्यांचा ओरडा खाणे एवढे असामान्य किंवा 'सीरियस इश्यू' आहे का?
हिंदीत तर एक दोहाच आहे
"निंदक नियरे राखिए ऑंगन कुटी छवाय,
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय।"
बघा पटतंय का… .