स्वराज्याचं रोपटं रुजून मोठे होण्या अगोदरच अफझलखान चाल करून आला. संकट भीषण होते पण राजांनी ते शिवधनुष्य लीलया पेलले. पुढे मात्र आदिलशाहीने सिद्दी जौहर आणि मुघलांनी शाहिस्तेखान यांच्या रूपाने एकाच वेळी आघाड्या उघडल्या. जौहरने राजांना जखडले तर खान स्वराज्य गिळायला टपला होता. अश्या प्रसंगी एक धाडसी बेत आखून बाजीप्रभू आणि अवघ्या सहाशे बांदलांच्या साहाय्याने राजे पन्हाळगडावरून निसटले. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या जौहरच्या फौजेला बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल आणि तीनशे मावळ्यांनी गजापूरची घोडखिंड
थोपवून धरली आणि शेवटी त्यांच्या बलिदानाने घोडखिंड 'पावन' झाली. बाजीप्रभूंनी आणि बांदलांनी बलिदान दिल्यामुळेच राजे पुढे मुघलांसोबत दोन हात करायला सज्ज झाले आणि पुढे स्वराज्याच्या रोपट्याचा वृक्ष झाला ज्याची सावली आजही आपल्यावर पडते आहे. तेव्हा राजे या संकटात सापडून सुटण्याची, त्यामागच्या राजनैतिक हालचालींची आणि मृत्यूसमोर स्पष्ट दिसत असताना देखील त्याला सामोरे जाणाऱ्या बाजीप्रभू आणि बांदलांची ही कथा म्हणजे 'शर्थीने खिंड लढविली'..