आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे, वावरणाऱ्या व्यक्तींकडे उघड्या डोळ्यांनी बघितल्यास अनेक कथाबीजं आपणास गवसत जातात अन् त्यातूनच एखादी कथा जन्मास येते. कल्पनेचा कुंचला वास्तवतेच्या रंगात बुडवून तयार झालेले हे सुंदर कथाचित्र मग सर्वांच्याच मनाला भावते. धो धो कोसळून बरसलेल्या पावसानंतर स्वच्छ, निरभ्र झालेल्या आकाशाप्रमाणे लेखणीतून कागदावर मनातील विचार बरसले की, हे मन देखील मोकळ्या आकाशासम स्वच्छ होते.
माझ्या या कथासंग्रहातील कथा अत्यंत सुटसुटीत, वैविध्यपूर्ण अन् मानवी भावविश्वास स्पर्श करून जाणाऱ्या आहेत. त्या वाचत असताना कथेचे सूत्र, त्यातील पात्रे आपल्या अवतीभोवतीच वावरणारी आहेत, असा भास वाचकांना होईल इतक्या त्या वास्तव आहेत. त्यामुळे त्या वाचकांच्या पसंतीस उतरील असा विश्वास मला आहे.
- दिप्ती कुलकर्णी