या काव्यसंग्रहात मी अभंग, भक्तीगीत, अष्टाक्षरी, विडंबन काव्य, हास्यकविता, निसर्गकविता असे अनेक प्रकार घेतले आहेत. विषयही
वेगवेगळे आहेत. काही देवदेवतांच्या कथा अष्टाक्षरीच्या माध्यमातून कथन
केल्या आहेत, मराठीला मुक्तछंदातून मानवंदना दिली आहे, वाचनाचे महत्व
आणि महाराष्ट्राची महती पोवड्यातून वर्णिली आहे. कर्जत सारख्या
निसर्गरम्य गावात राहिल्यामुळे साहजिकच निसर्गाबद्दल प्रेम आपुलकी
मनात होतीच, त्यामुळेच मला निसर्ग कविता लिहिण्याची आवड लागली.
यात अनेक निसर्ग कविताही आहेत निसर्ग जसा रम्य, नितांत सुंदर असतो
असतो तसा जर तो कोपला तर त्याचे मानवी जीवनावर होणारे भयानक
परिणाम आपण सगळेच जाणतो. शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, यांवर
कविता तसेच जुलै२०२३ मध्ये इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली, या
दुर्घटनेत अनेक लोक निद्रिस्त असतानाच दरडी खाली गाडले गेले. या
घटनेला अनुसरून मी एक हायकू या काव्यसंग्रहात लिहिला आहे.
मानवासाठी निसर्ग करत असलेली तडजोड आणि निसर्ग कोपल्यावर
मानवाची होणारी जीवित आणि वित्तहानी याची वर्णने मी माझ्या
कवितांमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. कवीने फक्त कवीकल्पनांमध्येच
न रमता काव्यरूपाने जर काही संदेश देता आला तर ती समाजाची सेवाच होईल असे मला वाटते. - सौ. संपदा राजेश देशपांडे