प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे
एक विणलेले वस्त्र असते. त्यात अनेक भावना, सुख दुः खद अनेक प्रसंग,
अनेक बघितलेल्या घटना, काही अनुभवलेले अशा विविध धाग्यांची वीण
असते. एक धागा खेचला की दुसरा धागा सहज दिसायला लागतो. तसेच
भावनांचे आहे. एकामागून एक अंतरात त्या उचंबळत असतात. माणसाला
कितीही सुख असेल तरी सटवाईने लिहिलेला लेख म्हणजेच तुमचं नशीब
असतं. आयुष्य म्हणजेएक ठराविक गणित नसतं. केंव्हा काय होईल आणि
वजाबाकी चुकेल सांगता येत नाही. शेवटी तो प्राक्तनाचा भाग असतो. जे
मिळाले त्याचा आनंदही असतो आणि जे नाही मिळाले त्याची खंतही असते.
प्रत्येकाच्या जीवनात उतार चढाव असतात. त्यावर विचार मंथन केले की
हळूहळू भावनांचा आवेग वाढतो. काही विचार भावनांच्या शेल्यात गुरफटले
जातात. खोलवर दडलेले शब्द स्निग्धता आणि ओलावा घेऊन जेव्हा
कागदावर उमटतात तेव्हा सहज कवितेचा जन्म होतो.