गावाच्या मातीत वाढलेली कवयित्री सौ.भारती सावंत म्हणूनच प्रत्येक विषय तन्मयतेने आणि अपूर्वाईने मांडताना दिसत आहे. बहुतेक कविता पाऊस आणि निसर्गावर आहेत. यातून कवयित्रीचे निसर्गप्रेम दिसून येतेच. प्रत्येक विषयाला हळुवारपणे स्पर्श करत असताना कवयित्रीच्या भावनाप्रधान व्यक्तिमत्त्वाचा इथे प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. त्याचप्रमाणे या हळव्या स्वभावातून विविधांगी काव्याची निर्मिती आकारास आली आहे आणि विविध कवितांचा हा नजराणा वाचकांच्या पसंतीस उतरणारच अशी मला खात्री आहे.