आयुष्यात प्रत्येक नात्याचं आपापलं महत्त्व असतं, कोणतंही नातं कोणत्या दुसऱ्या नात्याची जागा कधीच कधीच घेऊ शकत नाही. असंच जर कोणी सांगितलं की मी तुझ्या बहिणी सरखी आहे पण बहिणीसारखं असणं आणि बहीण असणं याच्यातला फरक फार मोठा आहे. नात्यांची मजा याच्यात आहे की प्रत्येकाने आपापलं नातं मनःपूर्वक आनंदाने संभाळावं. जे नातं आहे त्याच्यात राहण्याची मजा आणि प्रेम वेगळच आहे.
असंच एक नातं असतं मामीचं. मामी म्हणजे आजोळीचा आनंद.... मामी म्हणजे फक्त प्रेम आणि मामी म्हणजे फक्त कर्तव्य सुद्धा कारण आयुष्यात काही विशेष काळाने पुष्कळशी नाती जुनी होत जातात आणि काळानंतराने ती नाती आपण विसरतही जातो पण त्या वेळेचा आनंद त्यावेळचे प्रेम कुठेतरी मनात लपलेलं असतं आणि ती व्यक्ती पुन्हा समोर आली तेव्हा ते प्रेम आणि ते नातं
आरश्या सारखं स्वच्छ होऊन परत आपल्या समोर आनंदाने उभं असत.... तर नातीगोतीपैकी आज पहिलं नातं आहे "मामी" आज एक कविता....
मामी
सदैव हसतमुख, सदैव कामात
सदैव आनंदी, सदैव आम्ही तिच्या प्रेमात...
मामी....
आजोळी सगळीकडे फक्त तिचाच डंका
अगं हे राहिले, अगं ते केव्हा करणार
असाच तिच्यावर सदैव प्रश्नांचा मारा...
मामी....
ती हसतमुखाने सगळं करत असते
त्याच्यात ती आमची आवड ही जपत असते...
मामी....
ताईंना हे आवडतं... मुलांना ते आवडतं
सहजच आजीच्या हातांची चव तिच्याही स्वयंपाकात येते...
मामी....
आजोळ हे आईबाबांशिवाय रहाण्याचे पहिलं ठिकाण.. तेव्हा आजीच्या कुशीत मामीच्या प्रेमाचा आधार
मामी... मामी म्हणजे
मऊ भातावर साजूक तुपाची धार
मामी.... मामी म्हणजे
आजोळी प्रकाशित देवघरातील समयी ची तेलवात....
सौ. मीनल आनंद विद्वांस