चौथा कमरा
गोष्ट तेंव्हाची जेंव्हा ,मी एक सामान्य गृहिणी होते .स्वयंपाकघर, माजघर ,शेजघर यासारख्या ठराविक आखलेल्या वर्तुळातून फिरणारी तृप्ता, घरात हसरे तारे आहेतच की असे म्हणत नक्षत्रांनी भरलेलं आकाश पाहायचं विसरून जाणारी!
कधीतरी पेपर वाचता वाचता अमृताने भाषणात म्हटलेलं वाक्य माझ्या वाचनात आलं ,तिन लिहिलं होतं ,"बाईला स्वतःचा अशा कमरा पाहिजे या वाक्याशी मी अडखळले आणि मग दिवसभर काम करताना मला हा कमरा अस्वस्थ करत राहिला .मी झपाटून गेले या विचारांनी. वाटलं ',मलाही असा चौथा कमरा असायला हवा '.विचार करता करता मी पांघरलेली सुखी गृहिणीची शाल अलगद गळून पडली,बोचू लागली.
अमृता प्रीतम माझी खूप आवडती लेखिका ,कवयित्री ,तिचं आत्मकथन 'रसीदी टिकट 'मी वाचलं होतं .तिचा स्पष्टवक्तेपणा मनस्वीपणा ,आपल्या अनुभूतीची प्रामाणिक राहण्याची वृत्ती मला भावून गेली होती. तिच्या कविताही तशाच,
वेदना हा अमृताच्या कवितेचा स्थायी भाव. तिची कविता ,'एक दर्द था, जो सिगरेट की तरह महिने चुपचाप पी लिया है /'ही वाचली आणि का कुणास ठाऊक मला महादेवी वर्मा ची ,'मैं नीर भरी दुःखकी बदरी.' ही कविता आठवली. महादेवी वर्मा चादुःख हाच स्थायीभाव आहे त्यामुळेच असं वाटलं असावं कदाचित !पण मग विचार केल्यावर या दोघींच्या वेदना ,दुखाची जात एकच असावी असं वरवर पाहताना जाणवलं पण महा देवीची वेदनेची जात आतल्या आत सोसण्याची ,अमृताची जीवनात केलेली बंडखोरी या वेदनेतही जाणवते.
तिला बंडखोरीसाठी द्यावी लागलेली किंमत, त्यातूनही तावून सुलाखून पुन्हा नव्याने स्वप्न पाहणारीअमृता ,तिच्या कवितेतून आपल्याला दिसते ,तेंव्हा मग त्या अनुभूतीशी आपली नकळत जवळीक साधली जाते आणि अमृताशी आपले भावनिक नाते जमत जाते.
खरंतर आपली स्त्रीमुक्तीची चळवळ तिच्या आत्म्याचा शोध घेणारी .संत कवियत्रीनी असा शोध अध्यात्मिक पातळीवरून आपल्या कवितेतून घेतला. समाजाची बंधने झुगारून बंड केले. अमृताने विचार आत्म्याचा शोध आपल्या कवितेतून घेतलेला आढळतो.
'आदिधर्म'सारख्या कवितेतून
अमृता म्हणते,
" मैने जब तू को पहना तो दोनों के बदन अंतर्धान थे/'
असे दोघांचे अशरीरी मिलन कवितेतून प्रगट करताना अमृता शेवटी म्हणते,
'यह मेरे और तेरे अस्तित्व का एक यज्ञ था|
धर्म-कर्म की कथा बहुत बाद की बात है/'
स्त्रीची शारीरिक मानसीक आणि भावनिक बंधने तिच्या कवितेतून जेव्हा प्रकट होतात ,तेंव्हा तिची कविता ही तिची राहत नाही तर तिच्यातून सारी स्त्री जात अभिव्यक्त होते.
तिची आत्म मिलन ही कविता तर त्याचे सुंदर उदाहरण आहे त्यात ती म्हणते
" मेरी सेज हाजीर है/
पर जूतेऔर कमीजकी तरह
तू अपना बदन भी उतार दे/
उधर मुढे पर रख दे/
कोई खास बात नही/
यह अपने अपने देश का रिवाज है/
अमृता हे एक पारदर्शी व्यक्तिमत्व होते. तिने आपले जगत असलेले जीवन आणि कविता यात कधीही अंतर राखले नाही. आपल्या सगळ्याच साहित्यातून एक आगळीवेगळी नाममुद्रा अमृताने उठवली. म्हणूनच तिला मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार हा सगळ्या स्त्री साहित्याचाच गौरव वाटतो आणि म्हणूनच अमृताच्या
साहित्याचे वाचन म्हणजे एक सुखावून टाकणारा मनाला मोहून टाकणारा ,समृद्ध करणारा अनुभव मला वाटतं.,
तिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हाची गोष्ट, तिच्या साहित्याचा चाहता तिला भेटायला आला, तेंव्हा तिला भेट म्हणून त्याने आपल्याकडील कपड्यात बांधलेली एक छोटी पुरचुंडी तिच्या पुढे केली.आणि म्हणाला ,'अमृताजी मी तुमच्या जन्म गावाची माती तुमच्या करता भेट म्हणून आणली आहे .हा अनुभव आपल्या कवितेतून साकारताना अमृता म्हणते
,"और मेरे वजूदको उसने छुआ धीरे से,
ऐसे ठजैसे कोई वतन की मिट्टीको छूता है/'
दिवाळीच्या आधीची रात्र .बाहेर दिवाळीची दिव्यांची रोषणाई वाद्यांचा जल्लोष आणि त्यामध्ये टीव्हीवर आलेले बातमी ,'अमृता प्रीतम काळाआड गेल्या.' बातमी ऐकताक्षणी मी क्षणभर सुन्न झाले दिवाळीचा आनंद ,भुईनळ पेटता पेटता
विझून जावा तसा विझून गेला.सर्व कामे उरकताना मनात फक्त अमृता होती. रात्रीच्या नीरव शांततेत आठवून गेले ते मी आवर्जून विकत घेतलेले अमृताच्या कवितेचे पुस्तक पुस्तकाच्या कपाटातून शोधून काढलं आणि कविता वाचत गेले तिच्या कविता वाचता वाचता शेवटी पोचले ते तिच्या माझ्याकडे माझा पत्ता या या कवितेशी,
'मी माझ्या घराचा नंबर पुसून टाकला आहे
आणि गल्लीचे नावही मिटवून टाकले आहे.
इतकेच नव्हे तर रस्ता दिशा यांच्या खुणाही
मिटवून टाकल्या आहेत.
जर तुम्हाला मला शोधायचे असेल
,तर तुम्ही प्रत्येक देशातल्या,प्रत्येक गल्लीच्या घराचा दरवाजा ठोठवा.
जिथे स्वतंत्र आत्म्याची झलक तुम्हाला दिसेल
समजा की,तेच माझं घर आहे."
कविता वाचली आणि मग लक्षात आलं अमृताला शोधायची आता मला तरी गरज नाही इतर माझ्या अंतर्मनात वास करून राहिली आहे .माझ्या जीवनाचा भाग झाली आहे. म्हटल्याप्रमाणे मीही माझा चौथा कमरा शोधला आहेच की .त्यातली ती माझी सखी आहे जिवाभावाची
रेखा मिरजकर खारघर
नवी मुंबई