• 04 December 2020

    ग्रंथश्रुति

    लंकेची पार्वती

    5 394

    लंकेची पार्वती

    मराठी भाषेत असंख्य म्हणी आणि वाक्प्रचार आहेत; काही बोली भाषेतून आलेले तर काही पौराणिक कथांच्या संदर्भाने आलेले. त्यापैकीच एक सुपरिचित म्हण म्हणजे "लंकेची पार्वती". एखाद्या अलंकाररहित स्त्रीसाठी वापरली जाणारी ही म्हण. लंका म्हंटली की रामायण आठवतं आणि आठवतात ते राम, लक्ष्मण, सीता. पण या म्हणीत असलेली कैलासावरची पार्वती लंकेशी कशी जोडली गेली यामागे एक मोठी रंजक पौराणिक कथा आहे...

    देवी लक्ष्मीचा डामडौल पाहून पार्वती स्वतःच्या साध्या राहणीबाबत मनातल्या मनात खट्टू झाली. ती भगवान शंकरांकडे गेली आणि म्हणाली, "मीदेखील एक देवी आहे; राणी आहे. तरीही माझ्याकडे ते वैभव नाही जे देवी लक्ष्मीकडे आहे. असं का? मलाही ते वैभव हवं आहे जे एखाद्या देवीकडे, राणीकडे असायला हवं"

    शिवशंभो तिला म्हणाले, "अगं, मी हा असा बैरागी. ही असली सुखलोलूप वृत्ती माझ्या स्वभावात नाही. आपल्या अस्तित्वाचं प्रयोजन वेगळ्या कारणासाठी आहे आणि त्यानुसारच आपली कृती, राहणी असणं क्रमप्राप्त आहे. तेव्हा तू विनाकारण हा हट्ट करू नको. बाकी तू एक दिव्य शक्तीपीठ आहेस आणि सगळ्यांच्या मनात तुझं आदराचं स्थान आहे. एका देवीची याहून वेगळी ओळख ती काय असावी?"

    देवी पार्वतीला शिवशंभोंचा हा युक्तिवाद पटला नाही आणि तिने तिचा हट्ट काही सोडला नाही. शेवटी मौन धारण करण्याची आणि कैलास सोडून जाण्याची धमकीच दिल्यावर शिवशंभोंना पार्वतीच्या मनाप्रमाणे करण्याशिवाय गत्यंतर राहिलं नाही. त्यांनी तिला वचन दिलं की इतर कुणाकडेही नाही असं वैभव मी तुझ्यासाठी निर्माण करेन.

    त्यांनी विश्वकर्माला पाचारण केलं आणि त्याला घडली हकिक़त सांगितली. विश्वकर्माने शिवशंभोंना वचन दिलं की तो देवी पार्वतीसाठी एका न-भूतो न-भविष्यती अशा नगरीची रचना करेल. विश्वकर्माच तो... त्याने मनात आणावं आणि भूलोकीही स्वर्ग निर्माण व्हावा. विश्वकर्माने सोन्याच्या विटा वापरून हिरे जवाहिरांनी सजवलेली एक अप्रतिम नगरी बनवली... "लंका". शिवशंभो विश्वकर्माच्या या कामावर बेहद खुष झाले आणि त्यांनी पार्वतीला बोलावून तिच्यासाठी वसवलेली ही सोन्याची नगरी दाखवली. तो सगळा श्रीमंती झगमगाट पाहून ती हरखून गेली आणि शिवशंभोंना लगेच त्या नगरीत रहायला जाण्यासाठी विनंती करू लागली. पण भगवान शंकरांनी मात्र त्या नगरीत देवी पार्वतीबरोबर रहायला जाण्यासाठी नकार दिला आणि म्हणाले, "हे वैभव तुला हवं होतं म्हणून ते निर्माण केलं. तू हवं तेव्हा इथे रहा. मी बैरागी, माझ्यासाठी या वैभवाचं काहीही मोल नाही."

    एक उत्तम मुहुर्त पाहून नगरप्रवेश करण्याचं ठरलं. या प्रसंगी मंगल पुजा सांगायला एखादा ज्ञानी ब्राम्हण हवा होता. रावण हा दशग्रंथी ब्राम्हण, शिवशंभोंचा निस्सिम भक्त. भगवान शंकराने रावणालाच पुजा सांगायला पाचारण केलं. समस्त देवी देवता, गंधर्व, किन्नर या सोहळ्याला उपस्थित होते आणि अशी अद्भूत नगरी पाहून सगळेच चकित झाले होते. रावणानेही नगरी पाहिली आणि हे वैभव पाहून तो स्तब्धच झाला! त्याच्या मनात आलं, "या अशा नगरीचा मला राजा होता आलं तर?!" पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला सावरलं, कारण ही नगरी शिवशंभोंनी पार्वतीसाठी घडवलेली होती.

    ठरल्याप्रमाणे रावणाने पुजा उत्तम रितीने यथासांग पार पाडली. त्याचं ज्ञान आणि पुजा सांगण्यातली निर्लेप भावना पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले आणि रावणाला म्हणाले, "आम्ही दोघंही तुझ्यावर बेहद्द खुष आहोत. दक्षिणा म्हणून काय देऊ, तूच सांग".

    हे ऐकून पुन्हा एकदा रावणाच्या मनात लंकाधिपती होण्याची लालसा जागृत झाली. तो शिवशंभोंना म्हणाला, "मी जे मागेन ते तुम्ही मला द्याल?". शिवशंभोंनी त्याला तसं वचन देताच रावण बोलता झाला, "हे भोलेनाथ, मला ही सोन्याची नगरी दक्षिणा म्हणून हवी आहे."

    हे ऐकून उपस्थित सगळेच स्तिमित झाले. आता भगवान शंकर रावणावर कोप पावतील आणि त्यांच्या रागापुढे रावणच काय कुणीही टिकू शकणार नाही. पण झालं वेगळंच. स्वभावाने बैरागी असलेल्या शिवशंभोंसाठी तसंही या मोहमायेचं काहीही मोल नव्हतं. त्यांनी लगेच प्रसन्न चित्ताने ती सोन्याची नगरी रावणाला देऊन टाकली. हे पाहून देवी पार्वती मात्र प्रचंड रागावली. भगवान शंकर त्यांनी दिलेल्या वचनात बांधलेले होते हे जाणून तिने त्यांना माफ केलं; पण अशी लालसा मनात बाळगून रावणाने पौरोहित्यातल्या स्वयंशिस्तीची मर्यादा ओलांडणे तिला आवडलं नाही. तिने त्याला शाप दिला... "तुझी ही लालसाच तुझ्या नाशाला कारणीभूत ठरेल. एका स्त्रीची लालसा तुझा आणि तुझ्या समस्त वंशाचा नाश करेल".

    इतकी सुरेख सोन्याची नगरी ... पण आपल्या पतीच्या भोळ्या स्वभावाचा फायदा उठवणाऱ्या रावणामुळे देवी पार्वती वेशीवरूनच रिकाम्या हाती परतली. हीच ती... म्हणीत उल्लेख केलेली "लंकेची पार्वती".

    ---

    पौराणिक कथांच्या बाबतीत सगळ्यात मोठी समस्या म्हणजे त्यांची अनेक प्रारूपं लोककथांच्या स्वरूपात प्रचलित आहेत. ही कथादेखील त्याला अपवाद नाहीच. या कथेच्या एका प्रारूपाचा उल्लेख अनेक ठिकाणी आणि विशेषतः ब्रज भाषेत आल्याने ती कथा इतर प्रारूपांच्या तुलनेत नक्कीच दखलपात्र ठरते. त्या कथेनुसार लक्ष्मीने पार्वतीचा अपमान केला आणि आपल्या श्रीमंतीचा गर्व करत तिला तिच्या साध्या राहणीवरून बोल लावले. हे पाहून व्यथित झालेल्या पार्वतीने शिवशंभोंकडे सोन्याच्या नगरीची मागणी केली आणि भगवान शंकरांनीही तिचा हट्ट पुरवत तिच्यासाठी सोन्याची लंका निर्माण केली. या कथेत पुजा सांगायला रावणाचे वडील, विश्रवा ॠषींना पाचारण करण्यात आलं होतं आणि त्यांनी दक्षिणास्वरूपात लंका मागितली; भोलेनाथांनी लंका दिल्यावर देवी पार्वतीने रावणाच्या वडिलांना एका स्त्रीपायी वंशनाश होईल असा शाप दिल्याचा उल्लेख या कथेत आहे.

    ---

    कथा जी असेल ती, पण कथासार इतकाच की पार्वतीला आपल्या वैभवसंपन्न आयुष्याच्या ऐन उंबरठ्यावरून रिक्त हाती परत फिरावं लागलं.

    खरं तर ही म्हण कुठल्याही गरीब स्त्रीसाठी वापरण्यासारखी नाही. अशी स्त्री जी तिच्या नवऱ्याच्या अव्यावहारिक वागण्यामुळे आपले अलंकार, श्रीमंती गमावून बसली आहे केवळ त्याच स्त्रीसाठी "लंकेची पार्वती" ही म्हण वापरली जावी; हाच कथासारही आहे. म्हणजे म्हणताना संबोधन त्या स्त्रीला, पण प्रत्यक्ष माप काढायचं ते जराही व्यवहार न कळल्याने घरावर दारिद्र्य आणणाऱ्या तिच्या नवऱ्याचं.

    “अहो, ऐहिकांचा हव्यास नसणं हा त्याचा स्वभाव होता आणि तो त्याच्या स्वभावानुसार वागला. यात त्या नवऱ्याची काय चूक?” असा युक्तिवाद भोलेनाथांच्या बाजूने नक्कीच होऊ शकतो. पण इथेच आणखी एक महत्वाची गोष्टं आपली भारतीय संस्कृती शिकवते.

    “मी कोण” याचं एकच एक वैश्विक उत्तर असू शकत नाही. माझ्या आई वडिलांसाठी मी त्यांचा मुलगा, बहिणीसाठी भाऊ, काका - काकूंसाठी पुतण्या, मुलीसाठी वडील, पत्नीसाठी पती… थोडक्यात काय तर “मी कोण” याचं उत्तर सापेक्ष आहे आणि ते “कुण्याच्या संदर्भाने” यावर अवलंबून आहे. आपल्या आयुष्यातली ही नाती म्हणजे वेगवेगळ्या भूमिका आहेत ज्या आपण निभावून न्यायच्या असतात. या सगळ्या नात्यांच्या पलीकडेही एक रिक्त जागा तुम्हाला सापडेल… तो मी, फक्त मी. त्या रिकाम्या चौकानात उभा असलेला मी कुणाचाही कुणीही नाही. पण इतर चौकोनातलं माझं अस्तित्व मात्र एका संदर्भाने आहे आणि तो प्रत्येक संदर्भ माझी जबाबदारी, त्या नात्याची जबाबदारी. इथे जर मी त्या रिकाम्या चौकोनातला “मी” बनून वागणार असेन तर मी त्या संदर्भाने असलेल्या माझ्या अस्तित्वाला न्याय देत नाहीये आणि इथेच मी त्या नात्याशी अन्याय करतोय.

    या कथेतही भगवान शंकर “पती” या चौकोनात उभे होते आणि मात्र वागताना ते व्यक्तिगत स्वभावगुणाप्रमाणे वागले. इथे त्यांनी “पती” या त्यांच्या त्या चौकानतल्या भूमिकेवर अन्याय केला आणि परिणाम असा की त्याची झळ त्यांच्या पत्नीला, देवी पार्वतीला सोसावी लागली. त्यामुळे आपण व्यक्तीशः कुणीही आणि कसेही असू, अमुक व्यक्तीच्या संदर्भाने असलेल्या भूमिकेत असताना आपल्याला त्या व्यक्तीच्या अगर नात्याच्या संदर्भानेच आपलं वर्तन ठेवायचं आहे ही साधी पण सामाजिक आणि सांसारिक सहजीवनाच्या अनुषंगाने अत्यंत मौलिक शिकवण या कथेतून कथाकाराने देण्याचा प्रयत्न केला आहे.

    तर अशी ही आपली अनोखी म्हण ... "लंकेची पार्वती".

    ऋतुराज पतकी



    Ruturaaj Patki


Your Rating
blank-star-rating
उज्वला कर्पे - (15 December 2020) 5
लंकेची पार्वती ही म्हण एका नव्या अर्थाने कळली, ही गोष्ट माहित नव्हती, एक नवीन पौराणिक कथा कळली ,माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

1 0

आसावरी वाईकर - (04 December 2020) 5
वाह.. कथा सांगता सांगता किती विचारप्रवाह सुंदररित्या एकत्र गुंफले आहेत.. 👌👌👌👌👌

1 0

राजीवलोचन पुंडलीक - (04 December 2020) 5
कथा पौराणिक ,उच्च संस्कारक्षम !लेख सुंदर झाला आहे.

1 0

Dr. Vidya Velhankar - (04 December 2020) 5
खूपच छान!!

1 0

Ranjana Marathe - (04 December 2020) 5

1 0

Arun Gadgil - (04 December 2020) 4

1 0

Radhika Godbole - (04 December 2020) 5
मस्तच👍

1 0

View More